सीबीआयकडून 5 जणांना अटक
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
कनिष्ठ न्यायालयांच्या तक्रारीवर कारवाई न होण्याप्रकरणी सरन्यायाधीशांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर सीबीआयने आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या विरोधात अपमानास्पद पोस्ट केल्याच्या आरोपाखाली 5 जणांना अटक केली आहे.
सरन्यायाधीश एन.व्ही. रमना यांनी धनबादचे न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या मृत्यूची दखल घेत केलेल्या सुनावणीदरम्यान नाराजी व्यक्त करणारी टिप्पणी केली होती. तपास यंत्रणा न्यायपालिकेला मदत करत नसल्याचे सरन्यायाधीशांनी सीबीआयला नोटीस बजावत म्हटले होते. सीबीआयने रविवारी न्यायाधीशांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱया 5 जणांना अटक केली आहे.
सीबीआयच्या वर्तनात बदल होईल अशी अपेक्षा होती, पण काहीच बदलले नाही. स्वतःला मिळणाऱया धमक्यांबद्दल न्यायाधीश सीबीआय आणि आयबीकडे तक्रारी करतात तेव्हा त्यांना मदत मिळत नसल्याचे सरन्यायाधीशांनी म्हटले होते.
झारखंडमधील सत्र न्यायाधीश उत्तम आनंद यांचा मॉर्निंग वॉकदरम्यान ऑटो रिक्षाने धडक दिल्याने 28 जुलै रोजी मृत्यू झाला होता. हाय-प्रोफाइल लोकांच्या बाजूने आदेश न दिल्यास न्यायपालिकेची बदनामी करण्याच प्रकार सुरू असल्याची कठोर टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान केली होती.