प्रतिनिधी / कोल्हापूर
तब्बल अडिच महिन्याच्या कालावधीनंतर जिल्हा व सत्र न्यायालयातील कामकाजाला सुरुवात झाली. पण कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर पक्षकारांना न्यायालयात येण्यास परवानगी नाही. तसेच वकिलांना बार रुम नसल्याने त्यांना ऊठ बैस करणे अशक्य झाले.नोंदणी कक्षामध्ये ४५३ व्यक्ती न्यायालयात आल्याची नोंद झाली. त्यामध्ये सर्व न्यायाधिश, न्यायालयीन कर्मचारी, वकील व मोजक्या पक्षकारांचा समावेश होता.
दिवसभर न्यायालयाच्या आवारात फक्त वकील आणि कर्मचारीच वावरत असल्याचे चित्र दिसून आले.
कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरातील सर्वच व्यवहार ठप्प झाले. देशातही सर्व शासकीय कामकाज, न्यायालयीन प्रक्रिया तब्बल अडिच महिने बंद राहिली. यामुळे न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये मोठे अडथळे निर्माण झाले. अनेक केसीस पेंडींग पडल्याने न्यायालयीन कामकाज सुरू करण्याचा निर्णय जिल्हा व सत्र न्यायालयाने घेतला. त्यानंतर सोमवार ८ जून पासून न्यायालयीन कामकाजाला सुरवात झाली. सकाळपासूनच न्यायालयीन कर्मचारी, वकील व न्यायाधिश यांनी न्यायालयामध्ये उपस्थिती लावली. मात्र दिवसभर पक्षकारांनीच कामकाजाकडे पाठ फिरवली.
कोरोना संसर्गाच्या धोक्यामुळे पक्षकारांना बंदी
न्यायालयामध्ये ४५ न्यायाधिश, ४५० वकील व शेकडो कर्मचारी सेवा बजावतात. जर प्रत्येक पक्षकार व त्यांचे समर्थक, सहकारी न्यायालयामध्ये आले तर सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडेल. परिणामी कोरोनाचा धोका वाढेल. याला बगल देण्याच्या उद्देशाने न्यायालयाने पक्षकारांना न्यायालयात सध्यातरी प्रवेश नाकारला आहे.मात्र अति महत्वाच्या कामासाठी मोजक्याच पक्षकारांना येण्यास परवानगी आहे. या गोष्टीमुळे न्यायालयीन कामकाजावर सोमवारी परिणाम दिसून आला.
बार रूम बंद असल्याने वकीलांची कोंडी
न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाली. मात्र बार रुमला कुलूप असल्याने वकिलांना दिवसभर न्यायालयाच्या व्हरांडयामध्येच थांबून रहावे लागले. बैठक व्यवस्थाच नसल्याने त्यांना कामामधे अडथळे जाणवले. वकील, न्यायाधिश व न्यायालयीन कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिति असूनही कामकाज करणे शक्य झाले नाही.
सॅनिटायझर, मास्क सक्ती व व्यवस्था
न्यायालयामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हातावर कर्मचारी सॅनीटायझर टाकून हात स्वच्छ करायला लावत होते. तसेच परिसरात मास्क खेरीज प्रवेश करण्यावर निर्बंध होते. ठिकठिकाणी घ्यावयाच्या दक्षतेबाबत सुचना फलक उभारले होते.
कामाकाजाविषयी न्यायाधिशांशी चर्चा करणार – बार असो. अध्यक्ष अॅड. रणजित गावडे
उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या आदेशाने न्यायालयीन कामकाज आजपासून सुरुवात झाली आहे. मात्र पक्षकारांना असलेली बंदी व वकिलांना येणाऱ्या अडचणीमुळे यापुढे कामकाज कसे चालवायचे याबाबत पुन्हा एकदा न्यायाधीशांची चर्चा करून मग पुढील निर्णय घेतले जातील असे बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. रणजीत गावडे यांनी सांगितले.