परमेश्वराची कृपा झाल्यास पायाने अधू असणारा मनुष्यही पर्वत ओलांडून जाऊ शकतो, अशा अर्थाची एक म्हण संस्कृत भाषेत आहे. छत्तीसगढ जिल्हय़ातील बालोद येथील निवासी चित्रसेन साहू यांचे दोन्ही पाय कृत्रिम आहेत. तथापि, त्यांनी गिर्यारोहक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही करून दाखविले. केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील उंच उंच पर्वत शिखरे सर करण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांना झपाटले असून त्यांनी असे अनेक पराक्रम केलेही आहेत.
यासाठी त्यांना अर्थातच प्रयत्नरूपी परमेश्वराची आराधना करावी लागली आहे. कठीण परिश्रम आणि निर्धार यांच्या जोरावर आज त्यांनी गिर्यारोहण क्षेत्रात स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. नुकतेच त्यांनी टांझानिया येथील माऊंट किलीमांजारो शिखर सर केले. तसेच ऑस्ट्रेलियातील माऊंट कोजियास्को आणि रशियातील माऊंट एलब्रुस सर करून एक विक्रम नोंदविला आहे. दोन्ही पाय कृत्रिम असलेल्या व्यक्ती ‘डबल एम्प्युटी’ असे संबोधले जाते. जगातील उंच पर्वत शिखरे सर करणारे ते भारतातील पहिले डबल एम्प्युटी ठरले आहेत. दोन्ही पाय कृत्रिम असल्याने साधे चालणेही कठीण असते. तथापि, त्यांनी पर्वत शिखरे सर करून इतरांसाठी आपण प्रेरणास्रोत असल्याचे सिद्ध केले आहे.
2014 मध्ये त्यांना दुर्दैवाने रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमवावे लागले. त्यांचा एक पाय जागीच पूर्णपणे कापला गेला होता तर दुसऱया पायाला जंतूसंसर्ग झाल्याने तो नंतर काढावा लागला होता. तथापि, अवघ्या सहा महिन्यात त्यांनी आपली इच्छाशक्ती परत कमावली आणि आत्मविश्वासाने गिर्यारोहण करण्याचे तंत्र शिकून घेतले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. त्यांचे मित्र, परिचित तसेच गिर्यारोहण क्षेत्राशी संबंधित सर्वांनाच त्यांचे अतिशय कौतुक वाटते. साऱया देशासाठी ते आदर्श ठरले आहेत.