ऑनलाईन टीम / चंदीगड :
पंजाबमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्यापासूनच लागू करण्यात आलेले निर्बंध 15 जूनपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे असले तरी राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आता राज्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवली जाणार आहेत. तसेच 50 % क्षमतेने खाजगी कार्यालये सुरू केली जाणार आहेत. तर रोज सायंकाळी 7 वाजल्यापासून ते सकाळी 6 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू जारी असणार आहे. तर रविवारी नियमित कर्फ्यू लागू असेल.
तर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी कोविड 19 महामारी दरम्यान, मेडिकल कॉलेजमधील प्राध्यापकांच्या सुट्ट्या रद्द करण्याऐवजी त्यांना पगारी सुट्टी दिली जाणार आहे, अशी घोषणा केली आहे.
याशिवाय सरकारकडून लग्न समारंभ आणि अंतिम विधीच्या संस्करासाठी केवळ 20 नागरिकांनाच सहभागी होण्यास परवानगी असणार आहे. यासोबतच राज्यात प्रवेश करताना लावण्यात आलेले निर्बंध देखील मागे घेण्यात आले आहेत. तसेच येणाऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यास नियमांमध्ये आणखी काही प्रमाणात सूट दिली जाणार आहे.