ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आपला लोकसभा मतदारसंघ वाराणसी मधील कामगार, स्वयंसेवी संघटनेच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वाराणसी आत्मनिर्भर भारताचे केंद्र बनू शकते, असा विश्वासही व्यक्त केला.
मोदी म्हणाले, श्रावण महिना चालू आहे. यावेळी वाराणसी मधील लोकांशी संवाद साधणे म्हणजे भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतल्यासारखे आहे. भगवान शंकराचे हे आशीर्वाद आहेत की, कोरोनाच्या संकटातही आपले हे वाराणसी उत्साही आहे. या संकट काळातही लढा देत आहेत. फक्त आपलेच काम करत आहेत असे नाही तर स्वतः पुढे येऊन जबाबदारीने कामे पूर्ण करत आहेत. हे एक नवीन रूप आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडे जेव्हा भोजन वितरण करण्यास जेव्हा गाड्यांची उणीव भासू लागली त्यावेळी डाक विभागाने आपल्या जवळ असलेल्या पोस्टल व्हॅन या कामासाठी दिल्या.
पुढे ते म्हणाले, आज देशात 80 कोटी पेक्षा अधिक लोकांना निःशुल्क धान्य वाटप केले जात आहे. याचा फायदा बनारस मधील गरीब, श्रमिकांना होत आहे. भारतात अमेरिकेपेक्षा दुप्पट लोकसंख्या आहे. तरी देखील लोकांकडून पैसे न घेता त्यांना धान्य वाटप केले जात आहे.
पुढे ते म्हणाले आज उत्तर प्रदेश कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यशस्वी झाले आहे. कोरोनाने आपल्याला आत्मनिर्भर बनवले आहे. आत्मनिर्भर भारताचे केंद्र होण्याची क्षमता वाराणसीमध्ये आहे आणि निश्चितच यासाठी वाराणसीकर मेहनत घेतील.