‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात साधला विद्यार्थी-पालकांशी संवाद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विद्यार्थ्यांनी सारा तणाव बाहेर सोडून परीक्षा केंद्रात प्रवेश करावा आणि शांत चित्ताने परीक्षेला सामोरे जावे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात त्यांनी बुधवारी संध्याकाळी देशभरातील निवडक विद्यार्थी, त्यांचे पालक व शिक्षक यांच्याशी संवाद साधला. प्रतिवर्षी हा कार्यक्रम परीक्षेच्या कालावधीआधी करण्यात येतो. यावेळी कोरोना उद्रेकाची स्थिती लक्षात घेऊन हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे करण्यात आला.
या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी विद्यार्थ्यांना यशस्वी कसे व्हावे याचे मार्गदर्शन केले. तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी यावरही विचार व्यक्त केले. पालक-विद्यार्थी संबंध आणि शिक्षकांचे उत्तरदायित्व यांचाही उहापोह त्यांनी आपल्या या तासभर चाललेल्या कार्यक्रमात केला.
कोरोना काळाचे लाभ-तोटे
सध्या कोरोनाच्या उद्रेकाचा काळ आहे. या काळात आपण बरेच काही गमावले असले तरी पुष्कळ कमावलेही आहे. दुसऱयाचे साहाय्य आपल्याला किती घ्यावे लागते याची नव्याने जाणीव आपल्याला झाली. याच काळात आपण आपल्या परिवाराशी अधिक प्रमाणात जोडले गेलो आहोत. याचा लाभ विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यात झाला, असे प्रतिपादन त्यांनी सर्वप्रथम केले.
यशस्वीतेचा मंत्र
परीक्षा किंवा अन्य कोणत्याही उपक्रमात यशस्वी व्हायचे असेल तर काही पथ्ये पाळावी लागतात. विशेषतः आपली स्मरणशक्ती तीव्र होण्यासाठी ‘इन्व्हॉल्व्ह, इंटरनलाईझ, असोशिएट व व्हय़ुज्वलाईझ या चार टप्प्यांचा उपयोग करावा लागतो. यासाठी प्रथम तणावमुक्तता आवश्यक असते. म्हणूनच परीक्षा केंद्रात जाताना आपले सर्व ताणतणाव बाहेर सोडूनच जावे. तणावमुक्त असल्यास केलेला अभ्यास व्यवस्थित आठवतो आणि तो आवश्यकतेनुसार उत्तर प्रत्रिकेवर उतरवता येतो, असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांना उद्देशून केले.
सभोवतीचे निरीक्षण आवश्यक
विद्यार्थीदशेत विषेशतः दहावी आणि बारावीच्या वर्गात गेल्यानंतर आपण आपल्या आवती भोवती जे घडत आहे त्याचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. आपल्या जवळपास इतके व्यावसायिक असतात, इतक्या घडामोडी घडतात आणि विविध प्रकारची कामे होत असतात की ती पाहूनच आपण बऱयाचशा बाबी शिकतो. आपल्याला आपला मार्ग ठरविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मिळते. हे मार्गदर्शनच अधिक महत्वाचे असते असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्तुतीचा मोह टाळावा
थोडीशी कामगिरी करून दाखविल्यानंतर आपली खूप प्रशंसा झाली पाहिजे असे अनेकांना वाटते. अशी स्तुतीप्रियता हानीकारक असते. अनेक लोक करीयर निवडताना सहजसाध्य मार्गांचा अवलंब करतात. फारसे प्रयत्न न करता यश आणि प्रसिद्धी मिळावी अशी त्यांची इच्छा असते. थोडय़ा श्रमात जास्त पैसे कमावायची महत्वाकांक्षाही असते. तथापि ही सवय अनेकदा दीर्घकालीन हितासाठी घातक ठरते. असे यश क्षणकालीन असते. त्यामुळे मार्ग निवडताना आणि प्रयत्न करताना दीर्घकालीन हिताचा विचार करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
पालकांची कृती महत्वाची
पालकांनी आपल्या मुलांची प्रगती आपल्या प्रतिष्ठेचा विषय बनविता कामा नये. तसेच आपल्या महत्वाकांक्षा मुलांकडून पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा करणेही हानीकारक आहे. मुलांचे भावविश्व विस्कटू नये हे पालकांनी पहावे, आपल्या अव्यवहार्य अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकून यांची मनःस्थिती द्विधा करू नये. मुलांना त्यांच्या क्षमतेनुसार फुलू देणे आवश्यक आहे, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
अवघड विषयांपासून पळू नका
विद्यार्थ्यांना काही विषय सोपे तर काही अवघड वाटतात. सोप्या विषयांचा अभ्यास अधिक उत्साहात केला जातो. तर अवघड विषय टाळण्याची वृत्ती असते. तथापि, परीक्षा सर्वच विषयांची द्यावयाची असल्याने अवघड विषयांचा अभ्यास करणे टाळू नये. उलट प्रथमपासून त्यांच्यावर लक्ष केंद्रीय करावे. तसे केल्याने ऐन परीक्षेच्या वेळी धडपडावे लागणार काही, असाही मोलाचा विचार त्यांनी मांडला.