2020 मधील शेवटच्या ‘मन की बात’ मधून केले आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशवासियांनी विदेशी बनावटीच्या वस्तू खरेदी न स्वदेशनिर्मित पर्यायी वस्तू खरेदी कराव्यात, असे स्पष्ट आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. 2020 या वर्षातील अखेरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलताना त्यांनी ‘व्होकल फॉर लोकल’ (स्वदेशीचे प्रचारक बना) या मंत्राचा पुनरुच्चार केला. केंद्र सरकारने ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार करण्यासाठी या घोषणेला चांगलाच पाठिंबा दिल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वदेशीचा नारा आता देशाच्या कानाकोपऱयात घुमत आहे. कोरोना विषाणूच्या आव्हानामुळे नागरीकांना स्वदेशीचे महत्व पटले. त्यांनी मोठय़ा प्रमाणात स्वदेश निर्मित वस्तूंचा स्वीकार करण्यास प्रारंभ केला आहे. याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर सुपरिणाम होत आहे. मुलांची खेळणी, छोटय़ा नित्योपयोगी वस्तू इत्यादी उत्पादनांची विक्री करताना आता व्यापारी भारत निर्मित वस्तूंनाच प्राधान्य देत आहेत असे दिसून येते, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
जागतिक गुणवत्तेचे उत्पादन हवे
देशातील उद्योजक आणि उत्पादकांनी आता ‘आत्मनिर्भर भारता’चे आव्हान स्वीकारावे आणि जागतिक गुणवत्तेच्या सर्वोच्च वस्तूंचे उत्पादन करावे. यामुळे नागरीकांना आपल्या देशात निर्माण झालेल्या वस्तू मिळतील आणि रोजगारनिर्मितीही मोठय़ा प्रमाणावर होईल. स्वदेशनिर्मित वस्तूंच्या खरेदीसंबंधी अवघ्या एक वर्षात जनतेच्या मानसिकतेत आता फार मोठे परिवर्तन झाले आहे. यातूनच देशाची झपाटय़ाने प्रगती होणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
अन्य विषयांनाही स्पर्श
आत्मनिर्भरतेखेरीज पंतप्रधान मोदी यांनी पर्यावरण संरक्षण, व्याघ्र प्रकल्प, वनांमध्ये झालेली वाढ इत्यादी मुद्दय़ांनाही स्पर्श केला. तसेच ‘मन की बात’ या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद आणि लोकांनी केलेल्या सूचना यांच्यासंबंधी समाधान व्यक्त करून असाच प्रतिसाद देण्याचे आवाहन केले.
वस्तूंची सूची बनवून कार्य करा
लोकांना आवश्यक वस्तूंची सूची बनवून त्या देशातच कशा निर्माण करता येतील यावर उद्योजकांनी विचार करावा. अशा वस्तूंची आयात शक्यतो टाळली पाहिजे. यासाठी लक्ष्यकेंद्री कार्यक्रम हाती घेण्याची आवश्यकता आहे. ज्या वस्तू देशात बनविणे शक्य आहे, त्या येथेच करून त्यांची विक्री केल्यास आत्मनिर्भर होण्याचे स्वप्न झपाटय़ाने साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शीख समाजाचा त्याग असामान्य
देशाचे संरक्षण आणि प्रगती यात शीख समाजाचा त्याग अनन्यसाधारण आहे. या समाजातील अनेक मान्यवरांनी देशाला मानाचे स्थान मिळवून दिले. गुरू गोविंदसिंग यांच्या असीम त्यागाने आपल्या संस्कृतीचे संरक्षण झाले. गुरू तेगबहाद्दूर सिंग यांच्या महान कार्याची आठवण सर्वांच्या मनात कोरली गेली आहे, अशा शब्दांमध्ये त्यांनी या समाजातील श्रेष्ठांची प्रशंसा केली.
काय म्हणाले पंतप्रधान…
ड उत्पादक आणि उद्योगक्षेत्रातील मान्यवरांनी जागतिक गुणवत्तेचे उत्पादन करण्यावर भर द्यावा. विदेशी वस्तूंचे पर्याय देशातच तयार करावेत.
ड नागरीकांनी विदेशी वस्तू खरेदी करण्याचा सोस टाळून स्वदेशनिर्मित वस्तू खरेदीलाच प्राधान्य द्यावे. आत्मनिर्भरतेचा मंत्र घराघरात पोहचला आहे.
ड कोरोना उद्रेकामुळे देशाने नव्या क्षमता आत्मसात केल्या. पुरवठा साखळय़ा तुटल्यामुळे स्थानिक उत्पादनांना मोठी मागणी निर्माण झाली.
ड ग्राहकांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग स्वीकारल्यामुळे आता उद्योजक व उत्पादनांनीही मागे राहू नये. ग्राहकांच्या पावलावर पाऊल टाकावे.
ड केवळ एका वर्षात लोकांच्या मानसिकतेत प्रचंड सकारात्मक परिवर्तन झाले आहे. या परिवर्तनाचा अर्थव्यवस्थेला लाभ होणे निश्चित आहे.