भोपाळ/प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी १७ सप्टेंबरला देशभरात महा लसीकरण मोहीम राबविण्यात आली. यावेळी लसीकरणाचा नवा विक्रम झाला. देशात २.५ कोटी लोकांना लस देत नवा रेकॉर्ड करण्यात आला. मात्र या आकडेवारीमध्ये गडबड असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. याचं कारण त्या दिवशी २७ लाख लस दिल्याची नोंदणी करणाऱ्या मध्य प्रदेशातील काही त्रुटी समोर आल्या आहेत. यामधील काही प्रकार तर आश्चर्यकारक आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार अनेकांनी तर करोनाची लस घेतली नसतानाही त्यांना लसीकरण प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
भोपाळमध्ये राहणाऱ्या आशुतोष शर्मा यांना १७ सप्टेंबरला रात्री ८ वाजता मोबाइलवर एक मेसेज आला. “विद्या शर्माजी, १७ सप्टेंबरला भारताने लसीकरणाचा नवा रेकॉर्ड केला त्याच दिवशी तुम्हाला कोविशिल्ड लसीचा दुसरा डोस यशस्वीपणे देण्यात आला,” असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं. पण, चार महिन्यांपूर्वीच विद्या शर्मा यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. त्यामुळे त्यांचा मुलगा आशुतोष शर्मा यांना धक्काच बसला. आता या लसीकरण मोहिमेत काही तरी घोळ असल्याचे बोलले जात आहे. तर अशितोषने आईच्या नावे आलेलं लसीकरण प्रमाणपत्र डाऊनलोड करुन सेव्हदेखील केलं आहे.