प्रतिनिधी/ बेळगाव
गुरुवर्य पं. रामभाऊ विजापूरे आणि प्रा. गुरुराज काटोटी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेला गुरु स्मृती हा कार्यक्रम शुक्रवारी आयएमईआरच्या सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. रविंद्र काटोटी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. नटवर्य प्रसाद पंडित, संधाशु कुलकर्णी, श्रीधर कुलकणी, गजानन कुलकणी व रविंद्र काटोटी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला गोव्याचे सोहम बापे यांचे संवादिनी वादन झाले. त्यांच्या तबला साथीला होते. अंगद देसाई, सोहम बापे यांनी राग मधुवंतीमध्ये विलंबित गत आणि द्रुत गत एकतालात सादर केली. त्यानंतर त्यांनी राग हंस ध्वनीमधील तीन तालातील एक गत सादर केली. स्मरणाचित्र आणि शाल देऊन रविंद्र माने यांनी त्यांना गौरविले.
त्यानंतर बेंगळूरु येथील अनिरुद्ध ऐताळ यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना श्रीदत्त यांनी तबला आणि तेजस काटोटी यांनी संवादिनी साथ केली. आपल्या गायनाची सुरुवात त्यांनी राग मारव्याने केली. ‘अरे जग बावरे’ हा एकतालातील ख्याल, ‘गुरुबिन ज्ञान न पावे’ ही तीन तालातील द्रुत बंदिश आणि तीन तालातील एक तराना सादर केला. आपल्या गायनाचा समारोप त्यांनी ‘मोक्ष सदना’ या कन्नड नाटयगीताने केला.
त्यानंतर पं. रामभाऊ विजापुरे यांच्या ज्ये÷ शिष्या प्रा. विजया धोपेश्वरकर यांचे ‘गुरु महिमा’ या विषयावर व्याख्यान झाले. संत वाङमयातील अनेक वचनाचे प्रमाण देऊन त्यांनी गुरूचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी पं. विश्वनाथ कान्हेरे यांचे शिष्य, ठाणे येथील श्री. अनंत जोशी यांचे संवादिनी वादन झाले. त्यांना तबला साथ केली श्री. अंगद देसाई व अनंत जोशी यांनी आपल्या वादनाची सुरुवात राग बागेश्रीने केली. ‘कौन? गत भयी’ हा ख्याल त्यांनी विलंबित तिलवाडय़ात पेश केला. त्यानंतर त्यांनी मध्य लय आध्धातालात एक गत सादर केली. ‘धाडिला राम तिने कां वनी’ या नाटकातील ‘घाई नको बाई अशी, ‘आले रे बकुळ फुला’ हे नाटय़गीत सादर केले. रविंद्र काटोटी यांनी सर्वांचे आभार मानले.