उत्तर प्रदेशसह पाच राज्यांची विधानसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. 10 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्याचे, नंतर 14 फेब्रुवारीला उत्तर प्रदेशातील दुसऱया टप्याचे तर गोवा, मणीपूर आणि उत्तराखंड येथील मतदान होणार आहे. कोणतीही निवडणूक ही पक्षबदलूंसाठी एक पर्वणीच असते. नव्या पक्षात उडी मारणे आणि तेथून पूर्वीच्या पक्षावर दुगाण्या झाडणे ही त्यांची नेहमीची कार्यपद्धती. यंदाच्या निवडणूक काळात अशा ‘आयाराम गयारामां’ च्या हालचाली जरा जास्तच दिसत आहेत. तसेच त्यांच्या पक्षांतरांना निवडक पद्धतीने मुख्य प्रवाहातील वृत्तपत्रे आणि मिडियामधून वारेमाप प्रसिद्धीही मिळताना दिसते. जणूकाही या पक्षबदलूंवरच निवडणुकांचे परिणाम अवलंबून आहेत, आणि त्यांनी पक्ष सोडल्याने मोठाच भूकंप घडून राजकारण उलटेपालटे होणार, अशी रसभरीत मांडली अनेक माध्यमे-वृत्तपत्रांकडून केली जाताना पहावयास मिळते. या संदर्भात बराच ‘हंगामा’ (गोंधळ) माजविण्यात येत असल्याने त्याची दखल घेणे क्रमप्राप्त आहे. या निवडणूक काळात गेल्या दोन तीन महिन्यांपासून पक्षांतरे होत आहेत. त्यांचा प्रारंभ गोव्यापासून झाला, असे म्हणता येईल. गोव्यात काँगेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिनो फलेरो यांनी काँगेस सोडून तृणमूल काँगेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बराच गहजब करण्यात आला. आता तृणमूल काँगेस गोव्यात घट्ट पाय रोवणार आणि कदाचित साऱयांना मागे सारत ‘क्रांती’ घडविणार अशा अर्थाच्या वृत्तांचे फुगे मोठे होऊ लागले. तथापि, नंतर या राज्यात आम आदमी पक्षाकडे अशीच आयारामांची भरती सुरु झाली आणि तृणमूल आणि ममता बॅनर्जी यांचे नाव निवडणुकांची घोषणा होण्याच्याही पूर्वी मागे पडले. त्यानंतरचा मोठा हंगामा उत्तर प्रदेशात झाला. तेथे सत्ताधारी भाजपमधील स्वामी प्रसाद मौर्य आदी मागास समाजातील काही नेते पक्षाबाहेर पडले आणि सपच्या सायकलवर स्वार झाले. त्यामुळे तर मिडियात अंदाजबाँब्स्चे मोठमोठे धमाके झाले आणि अजूनही काही प्रमाणात होत आहेत. पण तत्पूर्वी काही दिवस आधी याच उत्तर प्रदेशात सप, बसप आणि काँगेसमधून भाजपमध्ये नेत्यांची आयात झाली होती. दोन दिवसांपूर्वीच सपचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंग यादव यांची प्रत्यक्ष सून अपर्णा यादव यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर त्यांनी स्तुतीसुमने उधळली. उत्तराखंडमध्ये भाजप नेते हरकसिंग रावत काँगेसच्या वाटेवर आहेत. हे पक्षबदलू किती प्रमाणात प्रवाभी ठरतात आणि त्यांच्या पक्षांतरांनी खरोखरच राजकीय समीकरणे किंवा मतदारांचे निर्णय बदलतात का हा एक वादग्रस्त विषय आहे. या प्रश्नाचे उत्तर कमी प्रमाणात होय आणि जास्त प्रमाणात नाही असे आहे. पक्षबदलूंमुळे निवडणुकांचे भवितव्य बदलले अशा घटना क्वचित आहेत. बहुतेकवेळा हे आयाराम गयाराम त्यांच्या नव्या वस्तीस्थानाला फारसा लाभ मिळवून देत नाहीत, असे दिसते. त्यांच्यापैकी काही जण, जे व्यक्तेशः प्रभावी असतात ते कोणत्याही पक्षात गेले तरी निवडून येतात. तथापि, ते नव्या पक्षाच्या जागा मोठय़ा प्रमाणात वाढवितात असे सामान्यतः आढळत नाही. मात्र या निरीक्षणाला काही मोजके अपवादही आहेत. या पक्षबदलूंचा इतिहास पाहिला असता ते त्यांच्या नव्या पक्षांतरापूर्वी बऱयाच पक्षांमधून प्रवास करुन आलेले आहेत असे दिसते. सध्या स्वामीप्रसाद मौर्य यांच्या पक्षांतराची चर्चा सर्वात जोरात चालली आहे. ते अवघ्या पाच वर्षांपूर्वी बसपमध्ये होते. बसपच्या मायावतींवर त्यांनी तिकिटे देताना पैसे घेतल्याचे आरोप केले. भाजपमध्ये आल्यानंतर त्यांना लगोलग मंत्री करण्यात आल. नंतर ते विधानसभा निवडणूक जिंकलेही. आता त्यांनी भाजपला आव्हान दिले असून आपण ज्या पक्षात जातो तो विजयी होतोच असा दावा केला आहे. या दाव्याची सत्यासत्यता 10 मार्चलाच उघड होणार आहे. काही महिन्यांपूवीं पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक झाली. तेथे शुभेंदू अधिकारी यांच्यासारखा तोलदान नेता तृणमूल सोडून भाजपमध्ये आला. तसेच इतरही अनेक आमदार या पक्षात आले. इतकेच नव्हे, तर अधिकारी यांनी प्रत्यक्ष ममता बॅनर्जी यांचा पराभवही केला. पण तृणमूलच्या मोठा विजय ते रोखू शकले नाहीत. महाराष्ट्रातही अनेक प्रभावी नेते इतर पक्षांमधून भाजपमध्ये आले. त्यांच्यापैकी अनेक जण व्यक्तीशः विजयी झाले पण पक्षाच्या जागा त्यांच्या येण्यामुळे वाढल्याचे दिसून आले नाही. मात्र कर्नाटक आणि मध्यप्रदेशात जेव्हा मोठय़ा प्रमाणात सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी राजीनामे दिले तेव्हा तेथे सत्तांतर घडून भाजपची राज्ये आली. नंतर झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये यांपैकी पुष्कळांचा विजयही झाला आणि या दोन राज्यांमधील भाजप सरकारे सुस्थिर झाली. या चार उदाहरणांवरुन असा निष्कर्ष सर्वसाधारणतः काढता येतो की निवडणूक ऐन तोंडावर आली असताना पक्षांतर घडले तर ते फारसे प्रभावी ठरत नाही. मात्र, निवडणूक झाल्यानंतर घाऊक पक्षांतरे घडली आणि त्यामुळे नवा पक्ष सत्तेवर आला तर हे पक्षबदलू नंतर होणाऱया पोटनिवडणुकांमध्ये विजयी होण्याची शक्यता जास्त असते. कारण लोकांना सतत निवडणुका नको असतात. शिवाय पक्षांतर ज्या पक्षात केले जाते तो पक्ष स्वतः प्रबळ असेल तर ते पक्षांतर यशस्वी होण्याची शक्यता जास्त असते. शिवाय पक्षांतराचा उद्देश कोणता हे देखील या संदर्भात महत्वाचे असते. हा उद्देश जनहिताचा आहे, हे मतदारांना पटल्यास ते पक्षबदलूंचे समर्थन करतात असेही दिसते. याचाच अर्थ असा की पक्षांतराचे यश हे पक्षांतर करणाऱया व्यक्तीपेक्षाही परिस्थिती, पक्षांतराची वेळ, उद्देश आणि प्रवेश केला जाणाऱया पक्षाचे सामर्थ्य यांवर अवलंबून असते. हे काही मोजके अपवाद वगळता अनेकदा दिसून आले आहे. पक्षांतरांमुळे राजकीय अस्थिरता निर्माण होते म्हणून पक्षांतर बंदी कायदा करण्यात आला होता. पण त्यातूनही मार्ग काढून पक्षांतरे होतात. हे वास्तव आज राजकारणात स्थिरावले आहे, असे अनेक घटनांवरुन स्पष्टपणे पहावयास मिळते.
Previous Articleमेदवेदेव्ह, सित्सिपस, साबालेन्का, कॉर्नेट यांची आगेकूच
Next Article 67 वर्षांपासून स्नान न करणारा अवलिया
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.