झारखंडमध्ये घटना : जंगलात आढळले मृतदेह
वृत्तसंस्था/ चाईबासा
झारखंडच्या चाईबासा जिल्हय़ात पत्थलगडीला विरोध करणाऱया 7 जणांची हत्या करण्यात आली आहे. पत्थलगडी समर्थकांनी या सर्वांचे पश्चिम सिंहभूमच्या गुलीकेरा गावातून रविवारी अपहरण केले होते. 19 तासांच्या शोध मोहिमेदरम्यान नक्षलग्रस्त गावापासून 3 किलोमीटर अंतरावरील जंगलात मृतदेह आढळल्याची माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक मुराली लाल मीणा यांनी बुधवारी दिली आहे.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. पण सरकार स्थापन केल्यावर सोरेन यांनी पत्थलगडी समर्थकांवर नोंद असलेले सर्व खटले मागे घेणार असल्याची घोषणा केली होती.
पत्थलगढीला विरोध करणारे उपसरपंच जेम्स बूढ यांच्यासह 7 जणांना बैठकीनंतर मारहाण करण्यात आली. पत्थलगढी समर्थकांनी अपहरण करत त्यांना जंगलाच्या दिशेने नेले होते. 7 ही जण न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. अपहृतांची हत्या करून त्यांचे मृतदेह जंगलात फेकण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. झारखंडमध्ये पत्थलगडीच्या समर्थनार्थ आतापर्यंत अनेक हिंसक घटना झाल्या आहेत.
पत्थलगडी म्हणजे काय?
पत्थलगडी आदिवासी समुदायाची परंपरा असून यात झारखंडच्या काही आदिवासी भागांमध्ये पत्थगलढी करत ग्रामसभा सर्वशक्तिशाली असल्याची घोषणा केली जाते. पण समाजकंटक आता याच्या प्रारुपात बदल करून गावाबाहेर पत्थलगडी करत आहेत. यानुसार एक मोठा दगड जमिनीत रोवून त्यावर भारतीय घटनेच्या अनुच्छेदांचा विपर्यास करत ग्रामस्थांना सरकारच्या विरोधात चिथावणी दिली जाते. शासकीय सुविधा तसेच मुलांना शाळेत जाऊ देण्यासही विरोध केला जातो. कायद्याला बाजूला सारूरन पंचायत घेत लोकांना शिक्षा सुनावली जाते. पत्थलगढी समर्थक पारंपरिक शस्त्रांसह गावाबाहेर पहारा देतात.