प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विकासकामांना गती मिळाली असली तरी ते काम पूर्ण करण्यास दिरंगाई करण्यात येत आहे. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत रस्त्यांचे व्हाईट टॉपिंग, अंतर्गत जलवाहिन्या, विद्युतवाहिनी यासह नव्याने पथदीप बसविण्याचे काम सुरू आहे. मात्र, हे काम अर्धवट असल्याचे निदर्शनास येत आहे. येथील टिळकवाडी छत्रपती रोड हिंदूनगरमध्ये पथदीप बसविण्याकरिता काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले असून ते अर्धवट स्थितीत ठेवण्यात आल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
या ठिकाणी पथदीप उभारणीकरिता काम करण्यात आले आहे. मात्र, ते सध्या अर्धवट स्थितीत असून सभोवताली कचऱयाचे साम्राज्य पसरले आहे. येथील पथदिपाच्या सभोवताली मातीचे साम्राज्य असल्याने अशा परिस्थितीत या ठिकाणी काँक्रीट घालणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. ही स्थिती या परिसरात ठिकठिकाणी अशीच असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
त्यामुळे संबंधित कंत्राटदाराच्या देखरेखीखाली स्मार्ट सिटीची कामे होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.