अभियांत्रिकी, डिप्लोमा महाविद्यायांचाही समावेश : प्रथम, द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी अनुकूल
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यातील शाळा-महाविद्यालये टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. 1 डिसेंबरपासून राज्यातील पदवी, पदव्युत्तर पदवी, अभियांत्रिकी आणि डिप्लोमाच्या अंतिम वर्ष/सेमिस्टरच्या विद्यार्थ्यांसाठी नियमितपणे वर्ग सुरू करण्यात आले होते. आता पहिल्या आणि दुसऱया वर्षातील विद्यार्थ्यांसाठी देखील 15 जानेवारीपासून नियमितपणे वर्ग सुरू केले जाणार आहेत.
कोरोना परिस्थितीमुळे आतापर्यंत ऑनलाईन शिक्षण घेत असलेल्या पदवी, अभियांत्रिकी, डिप्लोमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना आता ऑफलाईन शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयांचे दरवाजे पुन्हा खुले होत आहेत. उच्च शिक्षण खात्याकडून यासंबंधीची मार्गसूची लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. कोविड तांत्रिक सल्लागार समितीने केलेल्या सल्ल्यानुसारच महाविद्यालये पूर्ण प्रमाणात सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण यांनी दिली.
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे वर्ग सुरक्षित आणि प्रभावीपणे सुरू असल्याने प्रथम आणि द्वितीय वर्षातील पदवी, अभियांत्रिकी, डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी देखील महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाविद्यालयांबरोबरच विद्यार्थी वसतिगृहे देखील 15 जानेवारीपासून सुरू केली जाणार आहेत. महाविद्यालयांत हजर होणाऱया विद्यार्थ्यांसाठी बसपासची व्यवस्था देखील करण्यात येईल. महाविद्यालयांमधील ग्रंथालय, कॅन्टीन, शैक्षणिक, क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसंबंधील देखील मार्गसूची तयार केली जाणार आहे. एनसीसी आणि एनएसएसचे वर्गदेखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अश्वथ नारायण यांनी दिली.
पदवी आणि पदव्युत्तर विभागाचे सर्व वर्ग सुरू करण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी डॉ. अश्वथ नारायण यांनी बैठक घेतली. बैठकीत उच्च शिक्षण खात्याचे मुख्य सचिव कुमार नायक, आरोग्य खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जावेद अख्तर, मागासवर्ग खात्याच्या मुख सचिव रश्मी महेश, महाविद्यालयीन शिक्षण खात्याचे आयुक्त पी. प्रदीप आदी सहभागी झाले होते.