पुरीच्या रथयात्रेसाठी आणखी दोन याचिका : आज होणार सुनावणी
वृत्तसंस्था/ पुरी
जगन्नाथ पुरीमध्ये 23 जून रोजी होणाऱया रथयात्रेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. परंतु न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात 3 पुनर्विचार याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. बदललेल्या स्वरुपात रथयात्रेचे आयोजन करण्याची अनुमती देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. पुरी शहर पूर्णपणे शटडाउन करणे आणि जिल्हय़ाबाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घालून रथयात्रा आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे.
श्री जगन्नाथ मंदिर व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि पुरीचे गजपति महाराज दिव्यसिंग देव यांनीही राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात त्वरित दाद मागण्याचे आवाहन केले आहे. पुरी पीठाचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी याप्रकरणी पुनर्विचार करण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.
प्राचीन परंपरेचा अस्त होणार असल्यास भगवान जगन्नाथ क्षमा करणार का असे प्रश्नार्थक विधान पुरी मठाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या काळात रथयात्रेला अनुमती दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला कधीच माफ करणार नसल्याची टिप्पणी सर्वेच्च न्यायालयाने केली होती.
पुरी पीठाच्या शंकराचार्यांच्या अधिकारक्षेत्रात जगन्नाथ मंदिर येते. धार्मिक आणि आध्यात्मिक प्रकरणांमध्ये पीठाकडूनही सल्ला घेतला जावा. न्यायालयाने शुद्ध भावनेसह महामारीच्या कारणास्तव रथयात्रा रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा आम्ही आदर करतो, परंतु न्यायाधीशांनी यावर पुनर्विचार करावा असे निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले आहे.
निर्णयाच्या विरोधात समाजसेवक आफताब हुसैन यांनी याचिका दाखल केली होती. तर शनिवारी आणखी दोन याचिका दाखल झाल्या असून या सर्वांवर आज सुनावणी होणार आहे.