वार्ताहर/ धामणे
बळीराजाला शेतातील कसलेली पिके काढायचे झाले तर अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी मुसळधार पावसाने सर्व पिके वाहून गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. यंदा पावसाने सुरुवातीपासून पिकाला दिलासादायक हंगाम दिला. मात्र गेल्या 15 ते 20 दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याने बेळगाव तालुक्यातील धामणे, बस्तवाड, हालगा, कोंडसकोप, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, सुळगा (येळ्ळूर), अवचारहट्टी या भागातील शेतकरी संकटात सापडला असून पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागल्याने येथील शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे दिसत आहे.
यावर्षी सुरुवातीपासून या भागातील भात, सोयाबीन, बटाटा, भुईमूग या पिकांसाठी पोषक हंगाम मिळत गेला. परंतु ही सर्व पिके शेतकऱयांच्या हातातोंडाला येत असतानाच गेल्या 15 ते 20 दिवसांपासून परतीच्या पावसाने सोयाबीन, भुईमूग, बटाटा ही पिके जाग्यावरच कुजत असल्याने या भागातील शेतकरी हतबल होऊन नुकसानीला सामोरे जावे लागल्याचे शेतकरी वर्गातून सांगण्यात आले.
गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेला परतीचा पाऊस यंदा विचित्र पद्धतीने पडत आहे. त्यामुळे हातातोंडाला आलेल्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने धामणे, बस्तवाड, हालगा, कोंडसकोप, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड, सुळगा (ये.), अवचारहट्टी येथील शेतकऱयांचे नुकसान झाले आहे. नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, राजहंसगड येथील शेतकऱयांनी गेल्या आठवडय़ात पावसाने उघडीप दिली म्हणून माळशिवारातील भात पिकांच्या कापणीला सुरुवात केली. परंतु परतीच्या पावसाने अचानक हजेरी लावल्याने कापण्यात आलेले भात पीक पाण्याखाली येऊन शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले. त्याचप्रमाणे धामणे, बस्तवाड शेती शिवारातील भुईमूग व बटाटा काढणीच्या वेळेलाच परतीच्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
पिके काढण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल सुरू असतानाच परतीच्या पावसाची सुरुवात झाल्याने आता येथील शेतकऱयांची सर्व कामे खोळंबली असून शेतकऱयांना रिकामी बसण्याची वेळ आली आहे. धामणे, बस्तवाड, अवचारहट्टी येथील भात पीक यंदा आतापर्यंत चांगले होते. परंतु भात पिकावर करपा रोग पडल्याने आणि परतीच्या पावसाने उभे भातपीक पडून पाण्याखाली आल्याने शेतकऱयांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
प्रतिक्रिया
प्रगतशील शेतकरी रामा पाटील, धामणे (22डीआय 31)
हातातोंडाला आलेले यंदाचे भात पीक पोसवत असतानाच या पिकावर करपा रोग पडल्याने आणि परतीच्या मुसळधार पावसाने भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माझ्या शेतातील पिकावर जे परिणाम झाले आहेत. तसेच या परिसरातील शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने या भागात सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी.