वार्ताहर/ उचगाव
उचगाव परिसरातील चौदा गावांमध्ये महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, आंध्रप्रदेश येथून आलेल्या 156 जणांना त्या त्या गावातील प्राथमिक शाळांमधून क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांची दिवसागणिक तपासणी, चौकशी आणि देखरेख करण्यात येत आहे. सर्वाधिक नागरिकांची संख्या अतिवाड व बेकिनकेरे येथे असल्याची माहिती उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्याधिकारी डॉ. स्मिता गोडसे व ग्रा. पं. अध्यक्षा योगिता देसाई यांनी दिली.
यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, गडहिंग्लज, सातारा, गोवा येथून आलेल्यांना खबरदारी म्हणून क्वारंटाईन केल्याचे सांगण्यात आले. यामध्ये लष्करी जवान, गवंडी कामगार, सरकारी व खासगी नोकरी करणारे कर्मचारी तर फिरण्यासाठी गेलेले व लॉकडाऊनमध्ये अडकलेले यांचा समावेश आहे.
उचगावमध्ये 20, बेकिनकेरे 27, अतिवाड 43, मण्णूर 10, आंबेवाडी 7, तुरमुरी 10, कुदेमनी 15, सुळगा (हिं.) 9 व बाची, बसुर्ते, गोजगे प्रत्येकी एक शाळेमध्ये क्वारंटाईन केलेल्यांना ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जेवणाची सोय ग्राम पंचायतीतर्फे करण्यात आली आहे. या सर्वांची रोजची तपासणी, पाहाणी व चौकशी त्या त्या गावातील आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी शिक्षिका व उचगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर्स आणि कर्मचारी, नर्स करत आहेत.