बीच शॅक्सला मान्यता देऊ नये!
आनंद हुले यांची राज्य प्रधान सचिवांकडे मागणी
प्रतिनिधी / मालवण:
गिरगाव चौपाटीवर परप्रांतीय धनदांडग्या भांडवलदारांनी पर्यटनाच्या नावाखाली महाराष्ट्र शासनाची फसवणूक केली. तसेच बीच शॅक्स धोरण म्हणजे परप्रांतीय धनदांडग्यांना किनारपट्टी आंदण देण्याचे कारस्थान आहे, असा आरोप आनंद अतुल हुले यांनी केला आहे. दरम्यान, हुले यांनी याबाबत पर्यटन व सांस्कृतिक खात्याचे प्रधान सचिव यांना पत्र पाठवून आपली हरकत नोंदविली आहे.
बीच शॅक्सवर मद्यविक्री होणार आहे. सिंधुदुर्गात काही ठिकाणी अंमली पदार्थ विक्री व अनैतिक धंदे याविरुद्ध तक्रार करूनही समाजकंटकांविरुद्ध कारवाई होत नाही. सुसंस्कृत कोकणाला बीच शॅक्समुळे गुन्हेगारी व व्यसनाधीनतेला प्रोत्साहन मिळण्याची भीती आहे. पर्यटनाच्या नावाखाली संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कायद्याचे उल्लंघन करत, अनधिकृत बांधकामे मोठय़ा संख्येने झाली आहेत. ग्रामपंचायतीपासून ते नगर परिषदेपर्यंत भ्रष्ट अधिकारी, सरपंच, नगरसेवक त्याला संरक्षण देत आहेत. बीच शॅक्समुळे अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन मिळणार आहे, असेही हुले यांनी म्हटले आहे.
हाऊसबोटी का बुडाल्या?
करोडो रुपये खर्चूनही आतापर्यंत विजयदुर्ग ते वेंगुर्ले पर्यटन विकास शून्य झाला आहे. यासाठी पर्यटन धोरण बदलण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे गेली अनेक वर्षे पडून असलेल्या सिंधुदुर्ग कोकण किनारपट्टीवरील बोट सेवा (स्पीड बोट) विनावापर अवस्थेत आहे. कर्ली खाडीत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या कोटय़वधीच्या आलिशान हाऊसबोट बुडाल्या. अजून कोटय़वधींच्या तीन आलिशान हाऊसबोट भंगारावस्थेत सडत आहेत. 10 वर्षांपूर्वी एमटीडीसीने तारकर्लीला सिंधुकन्या हाऊसबोट सुरू केली. त्याला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. मोठय़ा प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात खेचायचे असतील, तर हाऊसबोट, निवती रॉक लाईट हाऊस असे उपक्रम कार्यान्वित होणे गरजेचे आहे. परंतु एमटीडीसीच्या हलगर्जीपणामुळे सिंधुकन्या हाऊसबोट बुडून रसातळाला गेली. दुरुस्ती करण्यासाठी कोणी येईल, या आशेवर सावित्री हाऊसबोट किनाऱयावर वाट पाहत आहे. हिरण्यकेशी व कर्ली हाऊसबोट किनारपट्टीवर अखेरचे आचके देत आहेत. सावित्री हाऊसबोट एमटीडीसी स्वत: सुरू करणार, असे समजते. मालवण पर्यटनस्थळी नगर पालिकेच्या वॉटर स्कूटर, स्पीड बोट भंगारावस्थेत पडल्या आहेत. पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी एमटीडीसीतून 55 कोटी खर्चून आणलेला डेक्कन ओडिसी नावाचा पांढरा हत्ती गेली नऊ वर्षे विनावापर पडून आहे. वनखात्याची बोट गेली दोन वर्षे तारकर्लीला सडतेय. पोलिसांच्या गस्तीनौका दुरुस्तीसाठी निधी नाही म्हणून सडल्या, असेही हुले म्हणतात.
प्लास्टिक कचऱयाची जबाबदारी कोणाची? प्लास्टिकचा सागरी प्रदूषणाचा धोका मोठा आहे. किनारपट्टीवरील पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी घनकचऱयाची व्यवस्था करण्याची पर्यटन खात्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. मालवण किनारपट्टीवरील प्लास्टिक, टीन, काचेच्या बाटल्या, मच्छीमारी जाळय़ांची शास्त्राrय विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मालवण पालिकेची आहे. या उपक्रमात स्थानिक मच्छीमारांना सहभागी करावे, असे मालवण नगरपरिषदेला लेखी व तोंडी कळविले होते परंतु कोणतेही उत्तर नाही. मालवण किनारपट्टीवरील रापणीच्या मच्छीमारी जाळय़ात प्लास्टिक, टीन, काचेच्या बाटल्यांमुळे पारंपरिक मच्छीमारांच्या धंद्यावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. सध्या किनारपट्टी दारू आणि प्लास्टिकच्या बाटल्यांच्या प्रदूषणात अडकली आहे. प्लास्टिक विघटनासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची निर्मल तट योजना यावर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करूनही दारूच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्यांच्या प्रदूषणात बीच शॅक्समुळे भर पडणार असल्याने जोपर्यंत शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत बीच शॅक्सला परवानगी देऊ नये, असेही हुले यांनी म्हटले आहे.