प्रतिनिधी / बेंगळूर
देशाच्या सैन्यदलात असाधारण कामगिरी करून परमवीरचक्रसह विविध शौर्य पुरस्कार मिळविणाऱया राज्यातील जवानांना राज्य सरकारकडून 25 लाख रुपये मानधन देण्यात येते. ही रक्कम 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केली आहे.
1971 च्या भारत-पाक युद्धाच्या 50 व्या विजयोत्सव वर्षानिमित्त विधानसौध आवारात आयोजित ‘सुवर्ण विजय वर्ष’ कार्यक्रमात ते बोलत होते. सध्या परमवीरचक्र पुरस्कार मिळविलेल्या जवानांना देण्यात येणारे 25 लाख रुपये मानधन 1 कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल. त्याचप्रमाणे अशोकचक्र विजेत्या जवानांना दिले जाणारे मानधन 25 लाखांवरून 1 कोटी रु., महावीरचक्र व कीर्तीचक्र विजेत्यांना 12 लाख रु. वरून 50 लाख रु., वीरचक्र आणि शौर्यचक्र पुरस्कार विजेत्या जवानांचे मानधन 5 लाख रु. वरून 25 लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात येईल, असे मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मंत्री बसवराज बोम्माई, आर. अशोक, सैन्यदलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.