जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा : दिलेल्या जमिनीवर अजूनही सरकारचेच नाव
प्रतिनिधी /बेळगाव
कुर्ली येथील शहीद जवान संजय वसंतराव देसाई यांच्या पालकांची गेल्याअनेक वर्षांपासून परवड सुरू आहे. तुमचा मुलगा शहीद झाला इतकेच सांगण्यात आले. मात्र सरकारकडून कोणताही मोबदला दिला गेला नाही. कर्नाटक सरकारने दोन एकर जमीन दिली. मात्र त्या जमिनीवर अजूनही सरकारचे नाव आहे. हे नाव कमी करण्यासाठी शहीद जवान संजय याचे वडील वसंतराव देसाई यांनी अनेक अधिकाऱयांकडे धाव घेतली. मात्र कोणत्याच अधिकाऱयाने सहानभूती दाखविली नाही. त्यामुळे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच आत्मदहन करण्याचा इशारा दिला. यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली.
कुर्ली येथील जवान संजय देसाई हा शहीद झाला. त्यानंतर त्या जवानाच्या कुटुंबीयांना काहीच दिले नाही. केवळ आईला मासिक दहा हजार रुपये पेन्शन म्हणून दिले जात आहेत. या व्यक्तीरिक्त कर्नाटक सरकारने सदलगे येथील अडी डोंगराजवळ 2 एकर जमीन मंजूर केली. मात्र त्या जमिनीवर शहीद जवानाचे वडील वसंतराव यांचे नाव दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत त्यांनी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजविले. मात्र कोणीच दखल घेतली नाही.
अधिकाऱयांच्या या दुर्लक्षामुळे शेवटी वसंतराव देसाई (वय 88) आणि त्यांची पत्नी अनुसया (वय 76) यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महदन करण्याचा इशारा दिला. एक शहीद जवानाच्या आई-वडिलांची ही अवस्था पाहून सारेजणच आश्चर्यचकीत झाले. तातडीने पोलिसांनी त्यांना जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱयांची भेट घडवून आणली. त्यानंतर निपाणीच्या तहसीलदारांनाही सूचना करण्यात आली. लवकरच तुमचे नाव दाखल होईल, असे आश्वासन अधिकाऱयांनी दिले आहे.