ऑनलाईन टीम /पुणे :
मधमाश्यांव्दारे जे परागीभवन व्हायचे, ती प्रक्रीया खुंटल्याने शेतीचे जीवनचक्र बिघडले. त्याचा परिणाम शेतीच्या उत्पन्नावर झाला. कमी उत्पन्नामुळे शेतकऱयांच्या वाढत्या आत्महत्यांच्या कारणांमागे मधमाश्यांचे कमी होत चाललेले प्रमाण, हेदेखील एक कारण असल्याचे मत मधमाशी संवर्धक अमित गोडसे यांनी व्यक्त केले.
१४ व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त मधमाशी संवर्धक अमित गोडसे यांच्याशी विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विदित रॉय आणि सुप्रिया चित्राव उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित गोडसे म्हणाले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करीत असताना, शहरीकरणाच्या चक्रव्युहात अडकलेलो असताना सोसायटीतील मधमाश्यांचे पोळे पेस्ट कंट्रोल करणा-या कंपनीच्या कर्मचाऱयांनी ज्या क्रूरतुने काढले त्यावेळी मृत मधमाश्यांचा तो सडा पाहून मी मधमाश्यांचे संवर्धन करण्याचा निर्णय घेऊन या क्षेत्रात आलो. गांडुळ, बेडुक, साप हे जसे शेतकऱयांचे मित्र म्हणवले जातात तसेच मधमाशी देखील त्या समुहापैकीच एक आहे. परंतु विषारी औषधांचा मारा करून मधमाश्यांची पोळी मोठ्या प्रमाणावर आजपर्यंत नष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे निसर्ग चक्रात मोलाची भूमिका बजावणारी एक साखळी निखळली गेली. शेतातील परागीभवनाची प्रक्रिया खुंटल्याने शेतक-यांचा बी-बियाण्यांचा खर्च वाढला आणि शेती हा न परवडणारा धंदा ठरू लागली.
मधमाश्यांच्या जीवनचक्रावर अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतर मधमाश्या या स्थलांतरीत होत असतात, असे लक्षात आले. त्या एका ठिकाणी पंधरा दिवस ते चार-पाच महिने एवढाच काळ वास्तव्य करीत असतात. मधमाश्या या ग्रामीण भागातील जंगल, शेत याठिकाणी पोळी करण्यापेक्षा शहरी भागात पोळे तयार करण्यास अधिक प्राधान्य देतात, असा धक्कादायक आणि आश्चर्यकारक निष्कर्ष हा अभ्यास करताना पुढे आला. शहरात उपलब्ध होत असलेले भरपूर पाणी, रसायनविरहित फुले आणि उंच इमारतींमुळे त्यांना पोळे तयार करण्यासाठी त्यांना उंचावर मिळणारी जागा या तीन कारणांमुळे त्यांनीही शहराकडे धाव घेतली आहे. शहरी लोकांना मध हवे आहे, पण मधमाश्या नकोत या चमत्कारीक मागणीला आम्हाला सामोरे जावे लागते. अशावेळी आम्ही पोळ्यांची पुनर्स्थापना करतो.
मधमाश्यांच्या पोळ्यातील राणीमाशी मेल्यास त्यांची संपूर्ण कॉलनी नष्ट पावते. त्यामुळे आम्ही शास्त्रशुद्ध पद्धतीने आम्ही या पोळ्यांची पुनर्स्थापना करीत असतो. पालघर, ठाणे यांसारख्या शहरांपासून आदिवासी आणि ग्रामीण पाड्यांपर्यंत आम्ही प्रशिक्षित चमू तयार करीत असून मधमाश्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहोत. ”वेस्ट टू वेल्थ” हा आमचा प्रवास सुरू असून आरोग्य आणि सौंदर्य प्रसाधन उद्योगात मध या नैसर्गिक घटकाचा कसा समावेश करून घेता येईल, यादृष्टीने देेखील आमचे प्रयत्न सुरू आहेत. भारतात आढळणाऱया विविधतेमुळे वेगवेगळ्या चवीचे, वेगवेगळ्या रंगांचे आणि वेगवेगळ्या औषधी गुणधर्मांचे मध आपल्याला उपलब्ध होते. त्याचा उपयोग करून घेण्यासाठी आपण मधमाश्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले पाहिजेत.