ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगाल राज्यातील गरिबांना जून 2021 पर्यंत धान्य मोफत दिले जाणार आहे, अशी घोषणा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली. याबरोबरच त्या म्हणाल्या, सकाळी 5.30 ते सकाळी 8.30 पर्यंत मॉर्निंग वॉकला परवानगी देत आहोत मात्र, यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच लग्न समारंभ आणि श्रद्धाच्या विधीमध्ये 25 च्या ऐवजी 50 लोकांना सहभागी होण्याची परवानगी देण्यात येत आहे.
पुढे त्या म्हणाल्या, मेट्रो आणि विमान उड्डाण सेवेच्या संदर्भात केंद्रीय गृह सचिवांना पत्र लिहिले आहे. या पत्रात 15 जुलै पर्यंत ज्या प्रमाणे आंतर राष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली आहे त्याप्रमाणेच, हॉटस्पॉट वरून देशांतर्गत उड्डाणांवर बंदी घालावी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी मेट्रो सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
याशिवाय पश्चिम बंगाल सरकारने सांगितले की, कॅन्टोन्मेंट झोनमध्ये 31 जुलै पर्यंत लॉक डाऊन वाढवण्यात आले आहे. यामध्ये शाळा, कॉलेज, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, जिम, मनोरंजन पार्क आदी बंद असणार आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, केंद्राकडून दिले जाणारे धान्य माझ्या राज्यातील केवळ 60 टक्के लोकांनाच दिले जात आहे. असा भेदभाव का केला जात आहे? असा सवाल करत त्यांनी राज्यातील 130 कोटी जनतेला धान्य मिळाले पाहिजे असे म्हटले आहे.