काँग्रेसचा प्रबळ दावा : शिवसेनेकडूनही फिल्डिंग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे साकडे
संजीव खाडे/कोल्हापूर
महाविकास आघाडी सरकारकडून राज्यातील सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट (मुंबई), विठ्ठल मंदिर ट्रस्ट (पंढरपूर) आणि शिर्डी देवस्थान संस्थान (साईबाबा मंदिर) देवस्थान समित्यांच्या जबाबदाऱयांचे वाटप निश्चित झाल्यानंतर आता कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची सूत्रे कुणाकडे याकडे साऱयांच्या नजरा लागल्या आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिर, दख्खनचा राजा जोतिबा मंदिरासह 3042 मंदिरांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱया या देवस्थान समितीसाठी काँग्रेसचा दावा प्रबळ असला तरी शिवसेनेनेही फिल्डिंग लावली आहे. देवस्थान समिती काँग्रेसला देणार असाल तर आम्हाला अंबाबाई मंदिर समितीची जबाबदारी द्या, असा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर प्रमुख देवस्थान समित्या, ट्रस्टच्या जबाबदाऱया निश्चित करण्यात आल्या. मुंबईचे ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असणाऱया सिद्धीविनायक मंदिर ट्रस्टची जबाबदारी अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडे सोपविण्यात आली आहे. शिवसेनेची मुंबईत असणारी ताकद आणि प्रारंभापासून या मंदिराकडे असणारा ओढा यामुळे सिद्धीविनायकाच्या सेवेची जबाबदारी शिवसेनेला मिळाली आहे. शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थान ट्रस्टची सूत्रे राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपविण्यात आली आहेत. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली संपूर्ण राजकीय ताकद दाखविली. शिर्डी ज्या जिल्हÎात आहे, तेथे राष्ट्रवादीचे आमदार सर्वाधिक आहेत. त्यामुळे आमदारांची जेवढी जादा संख्या त्यांच्याकडे देवस्थानची जबाबदारी असा फॉर्म्युला वापर अजितदादांनी शिर्डीची जबाबदारी राष्ट्रवादीकडे मिळवली. पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी देवस्थानची जबाबदारी काँग्रेसकडे देण्यात आली आहे. शिर्डीसाठी राष्ट्रवादीने पंढरपूर काँग्रेसला दिल्याचे सांगितले जाते. या तीन महत्वाच्या देवस्थानाची सूत्रे कुणाकडे हे स्पष्ट झाले असले तरी कोल्हापूरच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची सूत्रे कोणाला देण्यात येणार हे अद्याप गुलदस्त्या आहेत. अजितदादांच्या फॉर्म्युल्यानुसार पाहले तर कोल्हापूर जिल्हÎात काँग्रेसचे सहा आमदार असल्याने देवस्थान समिती काँगेसच्या वाटÎाला जाऊ शकते. त्यामुळे काँग्रेसचा दावाही प्रबळ आहे. यामध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. जर सूत्रे काँग्रेसकडे आली तर सतेज पाटील सांगतील तोच देवस्थान समितीचा अध्यक्ष होणार आहे. काँग्रेसकडून यापूर्वी देवस्थानच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेले ऍड. गुलाबराव घोरपडे यांच्यासह माजी महापौर सागर चव्हाण यांची नावे चर्चेत आहेत. राष्ट्रवादीनेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून देवस्थान समिती मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. पवार यांनी जर शब्द टाकला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तो डावलणार नाही, असा विश्वास राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱयांना आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष उद्योजक व्ही. बी. पाटील यांचे नाव चर्चेत आहे.
….काय म्हणते शिवसेना ?
देवस्थान समितीसाठी शिवसेनेनेही दंड थोपटले आहेत. करवीर निवासिनी अंबाबाईवर ठाकरे घराण्याची निस्सिम श्रद्धा आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या सर्व राजकीय सभा, दौरा, कार्यक्रमांची सुरूवात अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होत केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीच परंपरा कायम ठेवली आहे. शिवसेनेच्या सर्व खासदारांना घेऊन ते 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर अंबाबाईच्या दर्शनाला सपत्निक आले होते. त्यामुळे सध्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने देवस्थान समितीवर दावा केला आहे. त्यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आग्रही आहेत. त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी केली आहे. देवस्थान समिती जर काँग्रेसकडे जाणार असेल तर शिवसेनेला अंबाबाई मंदिर समितीची जबाबदारी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्यासह काही स्थानिक शिवसेना पदाधिकाऱयांनी केली आहे. अर्थात ही मागणी दोन समित्या झाल्या तर पूर्ण होऊ शकते. त्यासाठी मंदिरासंदर्भातील कायदा लागू करावा लागणार आहे. तरच समिती अस्तित्वात येणार आहे. त्यामुळे शिवसेनेची मागणी राज्य सरकार मंदिर कायद्याबाबत कोणता निर्णय घेते यावर अवलंबून राहणार आहे.