प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी येथील पहिले रेल्वेगेट येथे दुभाजकाजवळ लावण्यात आलेले बॅरिकेड्स रहदारीसाठी गैरसोयीचे ठरत आहेत. यामुळे व्यापारी, रहिवासी, विद्यार्थी, वयोवृद्ध व दिव्यांग नागरिकांना येणे-जाणे कठीण होत आहे. बॅरिकेड्स लावण्यात आल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याने या ठिकाणचे बॅरिकेड्स काढावेत, अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.
बॅरिकेड्स लावण्यात आल्याने नागरिकांना पुढे जाऊन पुन्हा माघारी फिरावे लागत आहे. यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच वाढ होत आहे. त्यामुळे येथील बॅरिकेड्स काढून तेथे रहदारी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणीही वेळोवेळी केली होती. सुभाष घोलप यांच्या नेतृत्वाखाली मागील 7 वर्षांपासून बॅरिकेड्स हटावसाठी आंदोलन केले जात आहे. त्यांना शहापूर येथील दीपक गौंडाडकर यांची साथ मिळाल्याने त्यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. रहदारी पोलीस अधिकारी शरणाप्पा यांच्यासमोर येथील समस्या मांडली. जोपर्यंत यातून मार्ग निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवू, असा इशारा दिला आहे.