प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन झाल्यानंतर थांबलेली उद्योगाची चाके अखेर सोमवारपासून सुरू झाली. पहिल्याच दिवशी 30 ते 40 टक्के कामगारांना घेऊन उद्योग सुरू करण्यात आले होते. जिल्हा औद्योगिक केंद्रामध्ये केलेल्या अर्जानुसार 300 उद्योग सुरू करण्यात आले. कच्चा माल, कर्मचारी, इतर साहित्य हा प्रश्न असला तरी येत्या 15 दिवसांमध्ये उद्योगांची स्थिती पूर्ववत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगावचा समावेश ऑरेंज झोनमध्ये झाल्यामुळे लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्हय़ातील उद्योग सुरू करण्यासाठीचे अडथळे दूर झाले. आर्थिक उलाढाल सुरू होण्याच्यादृष्टीने उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत उद्योग सुरू करण्यात आले आहेत.
डबल सील वाहनचालकांवर कारवाई
प्रशासनाचा आदेश डावलून काही कामगार डबल सीट प्रवास करीत होते. अशा वाहनचालकांवर पोलीस कारवाई करीत होते. वारंवार सूचना करूनही त्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे पोलिसांना कारवाई करण्याची वेळ आली. फाऊंड्री क्लस्टर कॉर्नर, मजगाव कॉर्नर या ठिकाणी पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. नावगे परिसरातही काही कामगारांची नाहक अडवणूक करण्यात आल्याने उद्योजकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
ग्रामपंचायतींनी निर्बंध लादू नये
तालुक्मयातील काही ग्रामपंचायतींनी गावातील नागरिकांना बाहेर जावू नये, असे बंधन घातले आहे. यामुळे कारखान्यांमध्ये येणाऱया कामगारांसमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याची तक्रार कारखानदारांनी जिल्हा औद्योगिक केंद्राकडे केली असून जिल्हा प्रशासनाशी चर्चा करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे ग्रामपंचायतींनी कामगारांवर निर्बंध लादू नयेत, अशी मागणी उद्योजकांमधून होत आहे.
राम भंडारे (अध्यक्ष, बेळगाव फाऊंड्री क्लस्टर)
सव्वा महिन्यानंतर पुन्हा एकदा उद्योग सुरू होत आहेत. परंतु कोरोनाच्या धास्तीमुळे कामगार येण्यास घाबरत आहेत, तसेच अनेकजण परगावी अडकले आहेत. त्यामुळे उपलब्ध कामगार घेऊन कारखाने सुरू करण्यात आले आहेत. कारखान्यांसाठी लागणारा माल हा पुणे येथून येत असल्यामुळे वाहतूक सुरळीत होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दोड्डबसवराजू (सहसंचालक, जिल्हा औद्योगिक केंद्र)
केंद्र व राज्य सरकारच्या नियमावलीनुसार सोमवारपासून बेळगावमधील उद्योग सुरू करण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर व मास्क कामगारांना वापरावे लागणार आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत उद्योग सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी कोणत्याही कर्मचाऱयांनी रस्त्यावर फिरू नये, एका दुचाकी वाहनावर एकच जण कामावर यावे, असे त्यांनी सांगितले.