प्राधान्याने दरडी दूर करण्याचे काम लवकर हाती घ्या
वार्ताहर/ संगमेश्वर
देवरुख ते रत्नागिरी मार्गावरील पांगरी येथे धोकादायक वळणावर दरडी कोसळण्याचे काम सुरुच असून अजूनही धोका कायम असल्याचे चित्र आहे.
देवरुख ते रत्नागिरी मार्गावर पांगरी येथील रस्ता धोकादायक आहे. वळणावळणाच्या रस्त्यामुळे अनेकवेळा पुढच्या वाहनाचा अंदाज येत नसल्याने अपघात घडतात. पावसाळय़ात पांगरी येथे दरडी कोसळण्याचे प्रमाण अधिक आहे. सद्यस्थितीत या रस्त्याचे रंदीकरण आणि मजबुतीकरण सुरु आहे. धोकादायक वळणे हटविण्याचे काम सुरुच आहे. मात्र दोन दिवसापूर्वी झालेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे पांगरी येथील वळणावरील दरड रस्त्यावर कोसळली. त्यामुळे माती व दगड रस्त्यावर येवून थांबले. सद्यस्थितीत रस्त्याचे काम सुरु असल्याने लगेचच रस्ता सुरळीत करण्यात आला. मात्र पोकरलेला डोंगर अधिकच खाली येत आहे. मात्र या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे धोकादायक फलक न बसवल्याने वाहनांची ये -जा सुरुच होती. वाहने जात असताना किंवा पादचारी चालत असताना दरड वाहनांवर कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या रंदीकरणाबरोबर पावसाळ्य़ाच्या अगोदर धोकादायक दरडी पहिल्यांदा बाजूला करण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे. दरवर्षी पावसाळय़ात येथे दरड खाली येवून वाहतुकीला अडथळा येत असून धोका अधिकच वाढत आहे.