राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे देशातील पहिले राज्य : सिंधुदुर्गातही मोठय़ा प्रमाणात आढळतो वृक्ष
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
कांदळवने समुद्र किनाऱयांचे लाटांपासून, त्सुनामीपासून तसेच नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण करतात. अनेक समुद्र प्रजातींचे प्रजनन कांदळवन क्षेत्रात होते. कांदळवन वृक्षांबाबत सर्वसामान्य जनता, विद्यार्थी यांना माहिती व्हावी, त्याचे महत्त्व समजावे. जेणेकरून कांदळवनाच्या संवर्धन, संरक्षणास सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळावा, यासाठी ‘पांढरी चिप्पी’ (सोनेरेशिया अल्बा) या वृक्षास राज्य कांदळवन वृक्ष म्हणून घोषीत करण्यात आले आहे. राज्य कांदळवन वृक्ष घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.
समुद्र किनाऱयाच्या भरती आणि ओहोटीच्या मधल्या क्षेत्रात अस्तित्व टिकवून ठेवणाऱया वनस्पतींना चिपीचे वन किंवा कांदळवन या नावाने ओळखले जाते. समुद्र किनाऱयाच्या भूभागाचे तसेच तिथल्या सर्व प्रकारच्या सजीवसृष्टीचे संरक्षण आणि अस्तित्व टिकून राहण्यासाठी कांदळवने खूपच महत्वाची भूमिका बजावतात.
किनारपट्टी भागात सर्वदूर आढळतो वृक्ष
आपल्या राज्याला 720 कि. मी. ची समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगरे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्हय़ात हे क्षेत्र आहे. देशातील कांदळवनांच्या एकूण प्रकारापैकी सुमारे वीस प्रकार आपल्या महाराष्ट्र किनारपट्टीवर दिसून येतात. या वीस प्रजातींपैकी पांढरी चिप्पी ही एक प्रजाती आहे. सोनेरेशिया अल्बा हा कांदळवनवृक्ष स्थानिक पातळीवर पांढरी चिप्पी या नावाने ओळखला जातो. हा वृक्ष दुर्मिळ नसला, तरीही राज्याच्या किनारपट्टीभागात सर्वदूर आढळतो. पांढऱया चिपीची फुले संगधी असून मधमाशा, कीटक व पक्षांना आकर्षित करात. पांढरी चिप्पी या वृक्षास कांदळवन कक्ष व मुख्य वन्यजीव रक्षक यांनी ‘राज्य कांदळवन वृक्ष’ म्हणून घोषीत करण्याचे प्रस्तावित केले होते. त्यानुसार राज्य शासनाने या वृक्षाला राज्य कांदळवन वृक्ष म्हणून नुकतीच घोषणा केली आहे. अशाप्रकारे घोषणा करणारे महाराष्ट्र हे दशातील एकमेव राज्य आहे.
भविष्यकालीन विचार करून मान्यता
उपलब्ध माहितीनुसार, पांढऱया चिपीची झाडे महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सर्वच जिल्हय़ात आढळतात. राज्याच्या किनारपट्टीवरील कांदळवनांमध्ये ‘तीवर’ या नावाने ओळखली जाणारी प्रजाती जास्त प्रमाणात आढळते. तीवर आणि पांढऱया चिपीमधला महत्वाचा फरक म्हणजे त्यांच्या श्वसन मुळांच्या उंचीमध्ये असतो. तीवरमध्ये उंची कमी असते परंतु, पांढऱया चिपीमध्ये उंची किमान 30 से. मी. पासून ते 100 से. मी. इतकी आढळते. त्यामुळे भविष्यातील जागतिक तापमानवाढीच्या काळात म्हणजेच येत्या काही वर्षांत समुद्राच्या पाण्याची पातळीत वाढ झाल्यास तीवर ही कांदळवन वनस्पती कमी होत जाऊन त्यांची जागा पांढरी चिपी भरून काढेल, असा कांदळवन अभ्यासकांचा आहे. त्यामुळे तीवर प्रजाती जास्त प्रमाणात आढळून येत असली, तरी भविष्यकालीन विचार करून पांढरी चिप्पीला राज्य कांदळवनवृक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात आतापर्यंत राज्यवृक्ष, राज्यफूल, राज्य प्राणी, राज्य पक्षी, राज्य फुलपाखरू अशी घोषणा झालेली असून त्या यादीत आता राज्य कांदळवन वृक्षाचे स्थानही निश्चित झाले आहे.
सिंधुदुर्गात बऱयाच भागात आढळते!
याबाबत बोलताना देशातील पहिली ‘कांदळवन सफारी’ चालविणाऱया वेंगुर्ले येथील श्वेता हुले म्हणाल्या, सिंधुदुर्गमध्ये पांढरी चिप्पी (सोनेरेशिया अल्बा) बऱयाच किनारपट्टी भागात आहे. वेंगुर्ल्यात मोठय़ा प्रमाणात आहे. देवगड, आचरा भागातही आहे. त्याचे फूल पांढरे असते. तसेच फळ साधारण सफरचंदाच्या आकाराचे असते. फळ पिकल्यानंतर पेरुसारखे लागते. त्याचे लोणचेही बनवितात. पांढऱया चिपीची मुळे ही मक्याच्या कणसाप्रमाणे असतात. तर तिवरांची पेंन्सिलप्रमाणे असतात. हे किनारपट्टी संरक्षणाचे काम करतात. त्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमती हुले या कांदळवन सफारीत सर्व कांदळवनवृक्षांची शास्त्राrय माहिती देतात. तसेच कांदळवन संवर्धनासाठीही त्या काम करीत आहेत.