ऑनलाईन टीम / कराची :
पाकिस्तानमध्ये चाळीस टक्के वैमानिकांकडे बोगस परवाने आहेत. मागील महिन्यात झालेल्या एका विमान अपघातानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानचे विमान वाहतूक मंत्री गुलाम सरवर खान यांनी संसदेत यासंदर्भात माहिती दिली.
बावीस मे रोजी पाकिस्तानच्या कराचीमध्ये एका विमानाला अपघात झाला होता. या अपघाताच्या तपासाचा अहवाल बुधवारी संसदेत सादर करण्यात आला. हा अहवाल सादर करताना खान म्हणाले, अपघातग्रस्त विमानात कोणताही तांत्रिक दोष नव्हता. या दुर्घटनेला पायलट, केबिन क्रू आणि एटीसी जबाबदार आहेत. क्रॅशपूर्वी पायलट कोरोनाव्हायरसवर चर्चा करीत होते. आमच्याकडे याचे रेकॉर्डिंग आहे. अपघातग्रस्त विमानातील वैमानिकला अति आत्मविश्वासात होता. त्यांनी विमानाकडे लक्ष दिले नाही. एटीसीने त्याला विमानाची उंची वाढवण्यास सांगितली होती. मात्र, त्यांनी उंची वाढवली नाही. या विमान अपघातात 8 केबिन क्रूसह 97 जण ठार झाले होते. या अपघातात दोघेजण बचावले आहेत.
पाकिस्तानच्या सरकारी विमान कंपन्यांमध्ये चाळीस टक्के वैमानिकांकडे बोगस परवाने आहेत. हे वैमानिक विमान उड्डाण करतात. त्यांनी कोणतीही परीक्षा दिली नाही किंवा त्यांना उड्डाणाचा अनुभव नाही. त्यांच्या भरतीत राजकीय हस्तक्षेप करण्यात आला आहे.