गोळीबारात एकाचा मृत्यू – 6 जणांचे अपहरण – गुजरात किनारपट्टीलगतची दुर्घटना
चंदिगढ / वृत्तसंस्था
गुजरातच्या किनाऱयालगत अरबी समुद्रात पाकिस्तानी नौसैनिकांनी भारतीय मच्छिमारांवर गोळीबार केला आहे. गुजरातमधील द्वारका येथील सागरी भागात पाकिस्तानी नौसैनिकांनी भारतीय नौकेवर गोळीबार केला. यामध्ये एका भारतीय मच्छिमाराचा मृत्यू झाला. श्रीधर असे मृताचे नाव असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
गुजरातमधील द्वारकाजवळील ओखा येथे भारतीय मच्छिमार मासेमारी करत असताना गोळीबार आणि अपहरणाची घटना घडली. मच्छिमारीसाठी नौकांचा विहार सुरू असतानाच पाकिस्तानी मरीन कमांडोची बोट बाहेर आली. त्यांनी भारतीय बोटीच्या सायरनवर गोळीबार केला. ही घटना शनिवारी रात्री घडली. गुजरात किनाऱयाजवळ झालेल्या गोळीबारानंतर पाकिस्तानी नौदलाकडून 6 मच्छिमारांचे अपहरणही करण्यात आले आहे. अपहृत मच्छिमारांना कुठे नेण्यात आले हे अद्याप समजू शकलेले नाही. घटनेच्या वेळी भारतीय बोट आपल्या हद्दीत होती. या गोळीबारात आणखी एक मच्छीमार जखमी झाला आहे.
पाकिस्तानकडून वारंवार सागरी हद्दीचा भंग
पाकिस्तानने समुद्रात भारतीय मच्छिमारांवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही पाकिस्तानी नौदलाने भारतीय मच्छिमारांचे अपहरण करून त्यांच्या बोटी ताब्यात घेतल्या आहेत. पाकिस्तानच्या या कृतीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये पुन्हा तणाव पाहायला मिळत आहे. यावषी मार्चमध्ये 11 भारतीय मच्छिमारांना पाकिस्तानने अटक केली होती. हे मच्छिमार आपल्या हद्दीत घुसल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. अरबी समुद्रातील सागरी सीमा स्पष्ट नसल्यामुळे अनेकदा दोन्ही देश एकमेकांच्या मच्छिमारांना अटक करतात. त्यानंतर विनाकारण वर्षानुवर्षे तुरुंगात राहावे लागते.
भारताची सागरी सीमा 7,516 किमी लांब आहे. त्यात पूर्वेला बंगालचा उपसागर, दक्षिणेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अरबी समुद्राच्या किनारपट्टीचा समावेश होतो. अंदमान आणि निकोबार बेटे 1,962 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीसह प्रथम क्रमांकावर आहेत. सागरी हद्दीच्या बाबतीत गुजरात दुसऱया क्रमांकावर आहे. येथील समुद्रकिनारा 1,600 किमी लांब आहे.
समुद्राला लागून असलेल्या सीमांच्या सुरक्षेची जबाबदारी नौदल, तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांवर असते. नौदल मोठय़ा युद्धसामग्री आणि क्षेपणास्त्रांनी सुसज्ज जहाजांच्या मदतीने बाह्य सागरी सीमांचे संरक्षण करते. तटरक्षक दल अंतर्गत भागांसाठी जबाबदार आहे. तटरक्षक दलाकडे स्वतःचे हेलिकॉप्टर आणि हायस्पीड बोटी असून त्यांचे जवान तत्परतेने भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करत असतात.