भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी, प्रक्षोभक विधानाचा देशात तीव्र निषेध
इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तो-झरदारी यांनी नरेंद्र मोदींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता आणखी एका पाकिस्तानी मंत्र्याने वादात भर टाकली आहे. बिलावल यांच्या वक्तव्याविरोधात भारतात तीव्र विरोध होत असतानाच पाकिस्तानच्या महिला मंत्री शाझिया मेरी यांनी शनिवारी भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली. आम्ही शांत बसण्यासाठी अणुबॉम्ब बनवलेला नाही, असे मेरी यांनी म्हटले आहे. मेरी यांच्या या विधानाचाही भारताने तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे.
बिलावलच्या समर्थनार्थ घेतलेल्या पत्रकार परिषदेत शाझिया मेरी यांनी भारताविरोधात गरळ ओकण्याचा प्रयत्न केला. भारताकडून काही कारवाई झाल्यास त्याला उत्तर दिले जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. ‘भारताला कसे उत्तर द्यायचे हे आम्हाला चांगलेच माहीत आहे. एक थप्पड मारून दुसरा गाल फिरवणारा पाकिस्तान हा देश नाही. मी अनेक मंचांवर मोदी सरकारने पाठवलेल्या प्रतिनिधींशी लढले आहे,’ असा दावा शाझिया मेरी यांनी केला.
भारतीय मंत्र्यांनी यूएनमध्ये पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र असल्याचे म्हटले आहे. अशी भाषा आम्ही यापूर्वीही अनुभवली आहे. आम्हालाही आमच्या देशाचे रक्षण करायचे आहे आणि देशाविरुद्धच्या चुकीच्या प्रचाराचे षड्यंत्र उघड करायचे आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. बिलावल भुत्तो यांनी भारताचे पंतप्रधान मोदी यांना ‘गुजरातचा कसाई’ संबोधल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. अशा स्थितीत शाझिया यांनीही प्रक्षोभक वक्तव्य केले आहे.