प्रतिनिधी / कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व आठवीची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार होती. परंतू राज्यभर झालेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश जिल्ह्यात महापूर आला होता. महापुरामुळे विद्यार्थी स्थलांतरीत झाले होते, तर शाळाही महापुराच्या पाण्याखाली गेल्या होत्या. त्यामुळे पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 9 ऑगस्ट ऐवजी 12 ऑगस्टला घेतली जाणार आहे, अशी माहिती परिपत्रकाव्दारे प्रसिध्द करण्यात आली आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये महापूर आल्यामुळे शाळा पाण्याखाली गेल्या होत्या. ज्या गावात महापुराने विळखा घातला होता, अशा गावातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रासह परराज्यात स्थलांतर केले होते. त्यामुळे शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी पालक, शिक्षक संघटनांकडून करण्यात आली होती. याची दखल घेत परीक्षा परिषदेने पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा 12 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय परिपत्रकाव्दारे जाहीर केला आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त विद्यार्थी व शाळांना दिलासा मिळाला आहे. परीक्षा परिषदेच्या या निर्णयाचे स्वागत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांकडून केले जात आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार 12 ऑगस्ट रोजी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचे नियोजन केले जाईल, अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी दिली आहे.