लवकरच शिक्षा सुनावणार, विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाचव्या चारा घोटाळय़ातही दोषी धरण्यात आले आहे. रांची येथील विशेष सीबीआय न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यांना शिक्षा लवकरच सुनावण्यात येत आहे. यापूर्वी आणखी चार चारा घोटाळय़ांमध्ये त्यांना शिक्षा झाली आहे.
हे प्रकरण 1991 ते 1996 या कालखंडातील आहे. त्यावेळी लालू प्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. या काळात त्यांनी दुभत्या जनावरांना चारा पुरविण्यासाठी निर्माण केलेल्या निधीतील 139.35 कोटी रुपयांचा अपहार केला, असा त्यांच्यावर आरोप होता. आरोप सिद्ध झाल्याने त्यांना दोषी धरण्यात आले आहे. हे प्रकरण दोरांदा चारा घोटाळा प्रकरण म्हणून बरेच गाजले होते.
एकंदर 950 कोटींचा घोटाळा
एकंदर पाच प्रकरणांचे हे चारा घोटाळा प्रकरण 950 कोटी रुपयांचे आहे. या प्रकरणांमध्ये दोषी ठरल्याने लालू प्रसाद यादव यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले होते. त्यांचे राजकीय भवितव्य यामुळे घसरणीला लागले. ही सर्व प्रकरणे 1996 मध्ये उघडकीस आली होती. तेव्हापासून ती सीबीआयच्या हाती होती.
75 जणांना शिक्षा
आतापर्यंत चारा घोटाळय़ाच्या पाच प्रकरणांमध्ये 75 आरोपींना शिक्षा झाली आहे. या सर्व प्रकरणांमध्ये लालू प्रसाद यादव हे मुख्य आरोपी होते. त्यांच्यावर चारा घोटाळय़ाचा कट रचल्याचा आणि तो प्रत्यक्षात आणल्याचा आरोप होता. त्यांना आतापर्यंतच्या प्रकरणांमध्ये एकंदर 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मध्यंतरीच्या काळात आजारीपणामुळे त्यांनी रुग्णालयांमध्ये वास्तव्य केले होते. या प्रकरणात त्यांना किती शिक्षा होणार हे नंतर कळणार आहे.
पूर्वीची चार प्रकरणे
ड 37.70 कोटीच्या चैबासा घोटाळय़ात 5 वर्षांचा कारावास, सध्या जामीनावर
ड 89.27 कोटीच्या देवघर घोटाळय़ात 3.5 वर्षांचा कारावास , सध्या जामीन
ड 33.13 कोटीच्या चैबासा घोटाळय़ात 5 वर्षांचा कारावास, सध्या जामीनावर
ड 3.76 कोटीच्या दुमका घोटाळय़ात 1.5 वर्षांचा कारावास, सध्या जामीनावर