प्रतिनिधी/ रत्नागिरी
नुकतेच बाप्पाचे मोठय़ा जल्लोषात आगमन झाले होते. गणरायाची मनोभावे प्रतिष्ठापना व पूजा-अर्चामुळे वातावरण गणेशमय बनले असतानाच पाच दिवसांच्या लाडक्या बाप्पासह गौराईचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. जिल्हय़ात आज 19 सार्वजनिक तर सुमारे 1 लाख 19 हजार घरगुती गणपती बाप्पांना विसर्जनाने निरोप दिला जाणार आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात शुक्रवारी घरोघरी, गावागावात मोठय़ा उत्साहात गणरायाचे स्वागत झाले. जिल्हाभरात 1 लाख 66 हजार 539 घरगुती व 108 सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणरायापाठोपाठ रविवारी लाडक्या गौराईचे आगमनही मोठय़ा थाटात झाले. तिचाही दोन दिवस मोठय़ा दिमाखात पाहुणचार घरोघरी झाला. आज मंगळवारी पाच दिवसांच्या या गणपतींचे सर्वत्र विसर्जन होणार आहे.
शहर व ग्रामीण भागात स्थानिक स्तरावर विसर्जनाचे नियोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी नगर परिषदेने कोरोना काळात गर्दी टाळण्यासाठी शहरातील माळनाका येथील व्यायामशाळेच्या ठिकाणी कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. दैवज्ञभवन, रिमांडहोम परिसरातील हौद, मांडवी येथेही विसर्जनाचे नियोजन केले आहे. मांडवी येथे मोठय़ा प्रमाणात होणारे गणेशविसर्जन लक्षात घेत तेथे निर्माल्य संकलन केले जाणार आहे यासाठी 15 कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात येणार आहे. मांडवी जेटीकडे विसर्जनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहनांना जाण्या-येण्यासाठी मार्गव्यवस्थेचे नियोजन केल्याचे नगरसेवक निमेश नायर यांनी सांगितले.