एकूण ग्राहक 44 हजार
थकित ग्राहक 15 हजार
थकित बिल 7 कोटी 98 लाख
वर्षभरापूर्वीपासून थकित 4 हजार 817 ग्राहक
थकबाकीची रक्कम कोटी 83 लाख रुपये
सावंतवाडी तालुक्यात आठ कोटी थकित : आता जोडणी वाचविण्यासाठी धावाधाव : 31 मार्चपर्यंत देण्यात आलीय मुदत
प्रतिनिधी / सावंतवाडी:
माझे वीज बिल-माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत वीज वितरण कंपनीने थकित ग्राहकांकडून बिल वसुलीची मोहीम हाती घेतली आहे. वीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी ग्राहकांकडे जाऊन वीज बिल भरा आणि वीज कनेक्शन तोडणी टाळा, असे आवाहन करत आहेत. आता वीज कंपनीने थकित ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यास प्रारंभ केला आहे. थकित बिल 31 मार्चपर्यंत न भरल्यास एक एप्रिलपासून वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे वीज ग्राहकांची धावाधाव सुरू झाली आहे. वर्षभरापूर्वीपासून बिल न भरणारे 4 हजार 817 ग्राहक तालुक्यात आहेत.
एकूणच राज्यकर्त्यांच्या आश्वासनावर अवलंबून वीज बिल न भरणाऱया ग्राहकांच्या बिलाची रक्कम फुगल्याने बिले भरताना नाकीनऊ आले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी नगरसेवक विलास जाधव, सुरेश भोगटे यांनी वीज वितरण कंपनी अधिकाऱयांची भेट घेऊन वीज कनेक्शन न तोडण्याचे आवाहन केले आहे. तर वीज कंपनीने एकदम बिल न भरू शकणाऱया ग्राहकांना बिल भरण्यासाठी टप्प्याटप्प्याने बिल भरण्याची सवलत दिली आहे. मात्र, त्याबाबतचा निर्णय अधिकारी घेणार आहेत.
कोरोनामुळे गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे लोकांना घरी बसावे लागले. अनेकांच्या नोकऱया, रोजगार गेले. तर अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले. लोकांची आर्थिक स्थिती बिकट झाली. वीज वितरणने काही महिने बिले काढली नाही. त्यामुळे बिले फुगली. अशाताच वीज बील सवलत, वीज बिल माफी अशी आश्वासने आणि ग्वाही राजकीय पक्षांकडून देण्यात येत होती. त्यामुळे अनेक ग्राहकांनी बिले भरली नाहीत. भाजपने वीज बिल माफ व्हावे, यासाठी आंदोलने केली. अर्थमंत्री अजित पवार यांनी यावर अधिवेशनात चर्चा करूनच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. मात्र, अधिवेशन संपताना उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल वसुली होणारच आणि बिल न भरणाऱया ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे वीज कंपनीने ‘माझे वीज बिल, माझी जबाबदारी’ अभियान थकित वीज बिल वसुलीसाठी सुरू केले आहे. त्या अंतर्गत थकित बिल वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आहे.
15 हजार ग्राहक थकित
31 मार्चपर्यंत बिल न भरणाऱया ग्राहकांचे वीज कनेक्शन एक एप्रिलनंतर तोडण्याचा इशारा दिला आहे. सावंतवाडी तालुक्यात 7 कोटी 98 लाख थकित बिल आहे. एकूण 44 हजारपैकी 15 हजार ग्राहक थकित आहेत. त्यात वर्षभरापूर्वीपासून बिल न भरणारे 4 हजार 817 ग्राहक आहेत. त्यांच्याकडे 3 कोटी 83 लाख रुपये थकित आहेत. घरगुती 12 हजार 361 ग्राहक असून त्यांच्याकडून साडेतीन कोटी, वाणिज्य 1 हजार 680 ग्राहकांकडून 1 कोटी 46 लाख, पथदिव्यांचे 271 ग्राहक असून त्यांच्याकडून 1 कोटी 61 लाख, औद्योगिक 251 ग्राहक असून त्यांच्याकडून 52 लाख, सरकारी 245 कार्यालयांकडून 14 लाख, शेती पंप ग्राहक 663 असून त्यांच्याकडून पाच लाख, सार्वजनिक पाणीपुरवठा 132 ग्रा. पं. कडून 49 लाख, इतर 50 ग्राहक असून त्यांच्याकडे पाच लाख थकित बिल आहे. बिल वसुलीची मोहीम उपअभियंता ई. बी लोहार, आर. बी. बागलकर, कर्मचारी एस. बी. भुरे, एन. व्ही. बिले राबवित आहेत.