प्रतिनिधी/ नवारस्ता
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरूवारी महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणाऱया कोयना धरण प्रकल्पास भेट देऊन पाहणी केली. धरणासह अलोरे येथील चौथ्या टप्प्यास भेट देऊन मुख्यमंत्री प्रकल्पग्रस्तांना न भेटताच मिडियाकडेही पाठ फिरवत वेळेचे कारण सांगून निघून गेले. त्यामुळे कोयना प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी निर्माण झाली. पाटण तालुक्याच्या पर्यटन विकासाचा आराखडा बनवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गुरुवारी सातारा आणि रत्नागिरी जिह्यातील कोयना आणि पोपळी वीज प्रकल्पाच्या पाहणीचा दौरा होता. नियोजित वेळेप्रमाणे गुरुवारी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री ठाकरे यांचे कोयनानगर येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. यावेळी त्यांच्या सोबत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, आमदार भास्कर जाधव, आमदार अनिल बाबर, खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाधिकारी शेखर सिंह, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे आदींनी स्वागत केले.
मुख्यमंत्री व त्यांचा ताफा तेथून पोपळी येथील वीजगृह टप्पा क्रमांक चारकडे रवाना झाला. तेथे त्यांनी वीजगृहाला भेट देऊन पाहणी केली. आवश्यक त्या सूचना दिल्या. येथील काही जुनी मशिनरी बदलण्यासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे हे कोयना धरणाची पाहणी करण्यासाठी कोयनानगर येथे आले. यावेळी मुख्यमंत्री वीज प्रकल्पाच्या शासकीय विश्रामगृहात काही वेळ येणार असल्याचे शासकीय यंत्रणेकडून सांगण्यात आले. त्यामुळे विश्रामगृह परिसरात कोयना धरण प्रकल्पग्रस्त, विविध संघटनांचे पदाधिकारी, मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मुख्यमंत्री येणार म्हणून येथे पोलीस बंदोबस्त देखील मोठय़ा प्रमाणात ठेवण्यात आला होता. सकाळी नऊ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांची वाट पाहात ताटकळत भर उन्हात उभे होते.
मात्र मुख्यमंत्र्यांनी वेळेचे कारण पुढे करून अचानक शासकीय विश्रामगृहकडील आपला दौरा बदलला. कोयना धरणाची पाहणी करून थेट हेलिपॅडवर दाखल झाले. उपस्थितांना धक्का देत ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची वाट पाहणारे प्रकल्पग्रस्त, धरणग्रस्त, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते, मिडियाचे प्रतिनिधी या सर्वांमधून नाराजी व्यक्त करण्यात केली.
त्यामुळे मुख्यमंत्री कोयनेत आले. धरणाची पाहणी केली. प्रकल्पग्रस्तांना न भेटताच निघून गेले, अशी चर्चा कोयनेत सुरू झाली.
जलसंपदा विभागाचे सचिव संजय घाणेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास रजपुत, जलसंदा विभागाचे अधीक्षक अभियंता संजय डोईफोडे आदी उपस्थित होते.