प्रतिनिधी / बेळगाव
एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग केलेल्या पाणीपुरवठा करणाऱया कामगारांना सेवेत कायम करावे, अशी मागणी केली होती. याबाबत आतापर्यंत कोणती कारवाई केली याची माहिती जाणून घेण्यासाठी कामगारांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. कागदपत्रे तयार करून राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी सांगितले.
पाणीपुरवठा मंडळाकडे काम करणाऱया 354 कामगारांना एल ऍण्ड टी कंपनीकडे वर्ग केले आहे. पण सदर कामगारांना वेळेवर पगार देण्यात आला नाही. तसेच पगारात कपात करण्यात आल्याने कामगारांनी काम बंद आंदोलन छेडून डॉ. आंबेडकर उद्यानात धरणे धरली होती. तसेच महापालिकेवर मोर्चा काढून सेवेत कायम करण्याच्या मागणीचे निवेदन महापालिका आयुक्तांना दिले होते. कामगारांना सेवेत कायम करण्याकरिता प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेतले होते. तसेच शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी आयुक्तांनी महिन्याचा अवधी घेतला होता. त्यामुळे कोणती कारवाई करण्यात आली, याची माहिती जाणून घेण्याकरिता पाणीपुरवठा कामगारांनी महापालिका आयुक्तांची गुरुवारी भेट घेतली. सेवेत कायम करण्याबाबत चौकशी केली असता, याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. आवश्यक कागदपत्रे घेतली असून हा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येत आहे. सध्या राज्यात पोटनिवडणुका सुरू असून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई होईल, असे त्यांनी कामगारांना सांगितले.
यावेळी पाणीपुरवठा विभागाचे बिल कलेक्टर, व्हॉल्वमॅन, डाटा एंट्री ऑपरेटर उपस्थित होते.