पारोडा-अवेडे पूल तसेच मडगाव-केपे मुख्य रस्ताही पाण्याखाली
वार्ताहर /केपे
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून रविवारी सायंकाळी सुमारे 7 च्या दरम्यान पारोडा येथे कुशावती नदीला पूर येऊन पारोडा व अवेडे यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेला. त्याचबरोबर मडगाव ते केपे हा मुख्य रस्ताही पारोडा येथे पाण्याखाली गेला आहे. यंदाच्या मोसमात पारोडा पूल पाण्याखाली जाण्याची ही पहिली घटना आहे.
काही दिवसांपूर्वी असाच मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर आला होता. पारोडा पुलापर्यंत पाणी पोहोचले होते. मात्र पुलावरून पाणी जाणार असे चित्र असताना पावसाचा जोर ओसरल्यामुळे नदीतील पाण्याची पातळी उतरली होती. पण पुन्हा पावसाचा जोर वाढत गेल्याने रविवारी सायंकाळी सातच्या दरम्यान नदीचे पाणी पुलावरून वाहू लागले. पर्वत-पारोडा ते पारोडा पंचायतीजवळच्या मुख्य रस्त्यावरही बरेच पाणी साठले होते. रविवार असल्याने मडगावहून ये-जा करणारी वाहने कमीच होती. मात्र पावसाचा जोर कमी झालेला नसून सोमवारीही रेड ऍलर्ट घोषित केल्याने पावसाचा जोर वाढू शकतो व मुख्य रस्त्यावर पाणी आणखी वाढू शकते. त्यामुळे सोमवारी सांगे, कुडचडे, केपे या भागांतून मडगावला कामाला जाणाऱया लोकांना चांदरमार्गे वळून जावे लागण्याची शक्मयता आहे.
दरवषी किमान तीन-चार वेळा तरी कुशावती नदीच्या पुराचा फटका बसून पारोडा पूल पाण्याखाली जात असतो व मुख्य रस्ताही पाण्याखाली जात असल्याने मुख्य रस्त्यावरची वाहतूक चांदरमार्गे वळवावी लागत असते. त्याचबरोबर अवेडे येथील ग्रामस्थांना या पुराचा फटका बसून त्यांना दुसऱया मार्गाने बाजारात किंवा मडगावला जावे लागते. कुशावती नदीच्या पुरामुळे आजुबाजूच्या बागायती व शेतांमध्येही पाणी भरत असते. यामुळे पारोडा व अवेडे ग्रामस्थांची बरीच अडचण होत असते. कुशावती नदीवरील अवेडे पूल हा 35-40 वर्षांपूर्वीचा असून दरवर्षी तो अनेक वेळा पाण्याखाली जात असतो म्हणून काही वर्षांपूर्वी स्व. मनोहर पर्रीकर यांनी पाहणी करून समस्या सोडविण्याची तयारी दर्शविली होती. पण अजूनपर्यंत प्रश्न सुटलेला नाही. हा अवेडे व पारोडा या दोन पंचायतींना जोडणारा पूल असून अवेडे पंचायतीने यावर उपाय म्हणून दुसरा समांतर पूल उभारण्यात यावा असा ठरावही घेतलेला आहे. ती फाईल महसूल खात्यापर्यंत पोहोचली असल्याची माहिती मिळाली आहे. असे असले, तरी हा समांतर पूल साकारण्यास किती काळ लागेल हे सांगता येत नाही. त्यामुळे लोकांच्या समस्या कायम राहिल्या आहेत.