नगरपालिकांवरील विजयानंतर शहरी भागातही भाजपाने आपली पकड भक्कम केली आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी ‘अच्छे दिन’चा संकेत देणारा हा निकाल आहे.
राज्यात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पणजी महापालिकेसह कुंकळ्ळी वगळता 7 पैकी 6 पालिकांवर मिळालेला एकतर्फी विजय भाजपाशिवाय पर्याय नाही हेच सांगतो. डिसेंबरमध्ये झालेल्या जि. पं. निवडणुकीत भाजपाने 48 पैकी 33 जागा जिंकून ग्रामीण भागात आपला प्रभाव दाखवून दिला होता. आता पालिकांवरील विजयानंतर शहरी भागातही त्यांनी आपली पकड भक्कम केली आहे. वर्षभरावर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी ‘अच्छे दिन’चा संकेत देणारा हा निकाल आहे.
पणजी महापालिकेसह राज्यातील बारा नगरपालिकांपैकी सात पालिकांसाठी मतदान होऊन नुकताच निकाल जाहीर झाला. त्यात पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने 30 पैकी 25 जागा जिंकल्या. काणकोणात सर्व बाराही जागांवर वर्चस्व राखले असून वाळपईत 10 पैकी 9 जागा एकहाती जिंकल्या. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला कुंकळळीची एकमेव जागा जिंकता आली. उर्वरीत एकाही जागेवर त्यांना आपले खातेही उघडता आले नाही. एकंदरीत निकाल पाहिल्यास 105 जागांपैकी 76 जागा जिंकून भाजपाने काँग्रेससह सर्व विरोधकांना गारद केले आहे. आरक्षणाच्या मुद्यावर मडगाव नगरपालिकेसह पाच पालिकांच्या निवडणुकांना न्यायालयाने चाप लावल्याने येत्या एप्रिलमध्ये त्या होणार आहेत. भाजपाचा उधळलेला वारू रोखण्यासाठी विरोधकांना ही संधी आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकांचा हा निकाल भाजपासाठी सकारात्मक तर विरोधकांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. गोव्यात काँग्रेसची राजकीय पडझड किती खोलवर झालेली आहे, हे त्यातून स्पष्ट होते. दक्षिण गोवा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याठिकाणी काँग्रेसची झालेली पिछेहाट येथील जिल्हा पंचायत पोट निवडणुकीतून दिसून आली.
शिवाय काँग्रेसची मतपेढी म्हणून ओळखल्या जाणाऱया ख्रिस्ती बहुल मतदार पर्याय म्हणून आम आदमी पक्षाकडे वळू लागल्याचे जिल्हा पंचायत व पालिका निवडणुकीतून स्पष्ट झाले आहे. पालिका निवडणूक ही पक्ष पातळीवर झाली नसली तरी प्रत्येक राजकीय पक्षाने अधिकृतरित्या आपले उमेदवार व पॅनल उभे केले होते. त्यात मगो व अन्य पक्षांचा कुठेच प्रभाव दिसून आला नाही.
राज्यात भाजपाने सध्या जे राजकीय डावपेच खेळायला सुरुवात केलेली आहे, त्यातून काँग्रेससह सर्व प्रादेशिक पक्षांना नामोहराम करून सोडले आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर भाजपाचे नेतृत्व डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आले. नुकतीच त्यांनी आपल्या कार्यकाळाची दोन वर्षे पूर्ण केली. या दोन वर्षांत राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. काँग्रेससह मगोचे दहा आमदार फोडून सत्तेला बळकटी देणारा राजकीय प्रयोग, आरक्षणात घातलेला घोळ व अन्य वादग्रस्त निर्णयांमुळे जनमत भाजपाच्या विरोधात आहे, असे दिसत होते. प्रथम जिल्हा पंचायत व आता पालिका निवडणुकीत संपादन केलेल्या एकतर्फी विजयामुळे जनता भाजपासोबत असल्याचे सिद्ध होते.
पालिका निवडणुकीत भाजपासमोर खरे आव्हान होते ते विरोधी पक्षांपेक्षा स्वपक्षातील बंडाळीचे. हा अंतर्गत विरोध पद्धतशीरपणे मोडून काढत भाजपा नेतृत्वाने विजय खेचून आणला. अर्थात त्यात साम, दाम, दंड या सर्व नीतींचा वापर झाला असेल, हे वेगळे सांगायला नको.
स्थानिक पातळीवरील स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व पक्षांना ही बंडाळी अपेक्षित असते. या विजयाचा अर्थ लावायचा झाल्यास इतर पक्षातून भाजपामध्ये आलेल्या आमदार मंत्र्यांनीच ही किमया साधलेली आहे. पणजी महापालिकेवरील विजयावर भाजपापेक्षा बाबुश मोन्सेरात यांचीच मोहोर उमटली आहे. वाळपई व पेडणेच्या विजयाचे शिल्पकार हे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे व उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर याबद्दलही दुमत नसावे. या तीनही आमदारांनी अनेकवेळा पक्ष बदलले. निदान पक्षबदलू म्हणूनच त्यांची ओळख आहे. भाजपाने अशा आमदारांना पक्षात स्थान व सत्तेची पदे दिल्याने पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्ता दुखावला व दुरावला गेला. अनेक मतदारसंघांमध्ये भाजपामध्ये अंतर्गत दुफळी आहे. जिल्हा पंचायत व पालिका निवडणुकीत ती जाहीरपणे दिसून आली. येणाऱया विधानसभा निवडणुकीत या पक्षबदलू आमदारांनी पुन्हा कोलांटी उडी मारल्यास, त्यातून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते गमावण्याची नामुष्की ओढवली जाऊ शकते.
ज्या शहरी मतदारांनी विश्वासाने विजयाची ही संधी दिली आहे, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे उत्तरदायित्व भाजपावर आहे. राज्यातील सर्व शहरांपुढे अनेक गहन प्रश्न उभे आहेत. वाढत्या प्रदूषणाबरोबरच वाहतूक व पार्किंगची समस्या, कचरा व्यवस्थापन यासह शहरांचे बकालीकरण रोखण्याचे आव्हान नवीन नगरसेवकांपुढे आहे. गोवा हे जागतिक पर्यटन स्थळ असल्याने येथील प्रत्येक शहर हे स्मार्ट सिटी होईल, प्रदूषणामुळे होणारी घुसमट थांबेल, वाहतूक व्यवस्थेत सूसत्रता येईल, प्रत्येक इमारतीच्या खाली पार्किंगसाठी पुरेशी जागा व फुटपाथ व्यवस्था असेल या नागरिकांच्या अपेक्षा आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येक क्षेत्रात गोवा स्वयंपूर्ण बनविण्याचा ध्यास घेतलेला आहे. दर जाहीर कार्यक्रमात ते आवर्जून स्वयंपूर्णतेची घोषणा करतात.
राज्यातील जिल्हा पंचायत संस्था ही अजूनही स्वयंपूर्ण झालेली नाही. नगरपालिका आर्थिकदृष्टय़ा सक्षम असल्या तरी तिला नियोजन, अत्यावश्यक साधनसुविधा व विकासाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण करण्याचे आव्हान सरकारपुढे आहे.
सदानंद सतरकर