सातारा / प्रतिनिधी :
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाच्या निवडणूक विभागाकडून एक परिपत्रक जारी होताच पालिकेच्या संभाव्य निवडणूका डोळय़ासमोर ठेवून सातारा विकास आघाडी आणि नगरविकास आघाडीमध्ये लेटर वॉर सुरु झाले आहे. तर नेत्यांचे विकासकामांचा नारळ फोडण्याचे आणि उद्घाटनांचे कार्यक्रम शहरात सुरु झाले आहेत. त्यामुळे दोन्ही आघाडय़ांकडून एकमेकांविरोधात कुरघोडय़ांचे राजकारण सुरु झाले असून तिसऱ्या पर्यायाला वाव मिळणार काय? असाही यक्ष प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
सातारा पालिकेच्या गतवेळीच्या निवडणूकीमध्ये नगरविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून श्री. छ. वेदांतिकाराजे भोसले होत्या तर सातारा विकास आघाडीकडून माधवी कदम या होत्या. त्यावेळी दोन्ही आघाडय़ांमध्ये वाद शिगेला पोहचला होता. त्यावेळी खासदार उदयनराजेंनी एकच नारा ठेवला होता तो म्हणजे सर्वसामान्य महिला नगराध्यक्ष होईल तर भाजपाच्यावतीने नगराध्यक्षापदाच्या उमेदवार या सुवर्णादेवी पाटील या होत्या. अशी तिरंगी निवडणूक झाली होती. त्यामध्ये सातारा विकास आघाडीची सत्ता आली होती. सातारा विकास आघाडीवर नगरविकास आघाडीकडून आरोप होवू लागले आहेत. तर नगरविकास आघाडीचे नेते आमदार शिवेंद्रराजे यांच्या हस्ते हद्दवाढ झालेल्या भागात विकास कामांचे नारळ ही फुटू लागले आहेत. दुसऱ्या बाजूला सातारा विकास आघाडीकडून पत्रकबाजी सुरु झाली आहे. येवू घातलेल्या पालिका निवडणूकीचे पडघमच सुरु झालेल्या लेटर वॉरवरुन दिसून येत आहे. त्यामध्ये तिसऱ्या पर्यायाला वाव मिळेल का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीकडून, शिवसेनेकडून पॅनेल टाकण्याची तयारी सुरु असली तरीही दोन्ही राजेंच्या आघाडय़ा त्यांना वाव देतील, असे चित्र सध्या तरी दिसत नाही.