वाई / प्रतिनिधी :
सोमवारी वाई शहरातील भाजी मंडई तब्बल अडीच महिन्यानंतर भरली. मात्र, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी मंगळवारी मंडई भरवू नका, असा तुघलकी फतवा काढला. त्यामुळे मंगळवारी वाईच्या भाजी मंडईत व्यापारी वर्गाने मंडई भरवली नाही. मात्र, मंडई भरवण्यासाठी नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे यांच्याकडे भाजी विक्रेत्यांनी विनंती केली. त्यांनी मुख्याधिकारी पोळ यांना विचारणा केली. मात्र, पोळ या मंडई सुरू न करण्यावर ठाम होत्या. दरम्यान, विरोधी पक्ष नेते सतिश वैराट यांनी ही त्यांना जाब विचारला. भाजी विक्रेते संघटनेचे पदाधिकारी किरण खामकर, युसुफभाई बागवान, संतोष जमदाडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंडई सुरू करण्याची विनंती केली.
दरम्यान, विक्रेत्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत होती. सोमवारी 100 भाजी विक्रेत्यांची अँटिजेन टेस्ट केली. त्यातील केवळ दोन जण पॉझिटिव्ह आले. त्यांनी खाजगीत टेस्ट केली तर ते निगेटिव्ह आले. सर्व पालिकेचे नियम पाळून भाजी विक्रेते व्यवसाय करत असताना व त्यांनी उसनवारी करून बाजार समितीतुन माल भरलेला असताना अचानकपणे मंडई मंगळवारपासून बंद ठेवण्याचा तोंडी आदेश देण्यात आला. त्यामुळे सकाळी कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने लावली नव्हती. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागाची कोरोना टेस्ट करणारी रुग्णवाहिका मंडईत टेस्ट करण्यासाठी आली. त्यावेळी व्यापाऱ्यांनी नगराध्यक्षा शिंदे यांना बोलवून मंडई सुरू करण्यासाठी विनंती केली. त्यावर नगराध्यक्षा डॉ.शिंदे यांनी थेट मुख्याधिकारी पोळ यांना फोन लावून मंडई सुरू करण्याची विनंती केली. तर वाई पालिकेचे विरोधी पक्ष नेते सतीश वैराट,नगरसेवक महेंद्र धनवे यांनी ही जिल्हाधिकारी यांचा आदेश आहे का?, मग मंडई बंद का ठेवली, विक्रेत्यांनी माल उसनवारी करून आणला आहे, असा जाब विचारला. भाजी विक्री संघटनेच्या पदाधिकारी यांनीही मुख्याधिकारी यांच्याकडे ही मागणी केली. मात्र, तोडगा निघाला नाही. त्यामुळे व्यापारी आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.