प्रतिनिधी/ सातारा
गेल्या दीड वर्षामध्ये सातारा पालिकेच्या आरोग्य विभागात सावळा गोंधळ सुरु होता. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी हा गोंधळ थांबवण्यासाठी केडरमधील आरोग्य निरीक्षक मागवून घेतले. परंतु त्या आरोग्य निरीक्षकांना काम करुन घेवून त्यांना सहीचे धनी बनवले आहे. अद्यापही पालिकेतील लिपीक आष्टेकर हेच विभागप्रमुख बनले आहेत. त्यामुळे अजूनही सावळा गोंधळ थांबलेला नाही. मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीच आरोग्य विभागाची जबाबदारी ठरवून द्यावी म्हणजेच आरोग्य विभागाचा कारभार पादर्शक होईल अशी भावना सर्वसामान्य सातारकरांची बनली आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागात सगळाच गेल्या दीड वर्षात सावळा गोंधळ सुरु होता. एकीचा अभाव होता. मनमानीपणे कामकाज सुरु होते. राजकीय वजन वापरुन विभागाचा कार्यभार घेतलेल्या कर्मचाऱयाच्या तक्रारी वाढत गेल्याने त्या विभागातून बदली करण्यात आली. परंतु त्यांच्या बदलीनंतर मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी केडरमधील आरोग्य निरीक्षक आणले. यांच्याकडे नियमानुसार कारभार द्यायला हवा होता. परंतु लिपीक पदावरील शैलेश आष्टेकर यांनी स्वतःच आरोग्य विभागातील विभाग प्रमुख म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे घडी विस्कटायला लागली आहे. या विभागाला वालीच कोण नसल्याची अवस्था झाली आहे. मर्जीप्रमाणे झाडू कर्मचाऱयांच्या बदल्या करण्यात येतात. तसेच मर्जीतल्याच नगरसेवकांच्या वॉर्डात कामे केली जातात. या विभागात मागच्या विभागप्रमुखांनी ज्या गमतीजमती केल्या आहेत त्यावर पांघरुण घालण्याचे काम यांच्याकडून सुरु असून मुख्याधिकारी बापट यांनी त्यांच्याकडून कार्यभार काढून घेवून केडरच्या आरोग्य निरीक्षकांकडे जबाबदारी द्यावी अशी मागणी होवू लागली आहे. अनेक बाबी आरोग्य विभागातील मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना सुद्धा माहिती नसतात, त्यामुळे मागचे दिवस पुढे येवू नयेत याकरता मुख्याधिकाऱयांनी आरोग्य विभागात खांदेपालट करावी, अशी सर्वसामान्य सातारकरांची भावना बनली आहे.