आस्थापन बेचिराख,जवळच्या दोन घरांनाही झळ,आगविझविण्याकामी अग्निशामकदलाला स्थानिकांची मदत
प्रतिनिधी / काणकोण
पाळोळे किनाऱयावरील ड्रीम कॅचर या आस्थापनाला लागलेल्या आगीत 35 लाख रुपयांपेक्षा अधिक हानी झालेली असून आगीची माहिती मिळताच काणकोणच्या अग्निशामक दलाचे जवान, मडगाव येथील अग्निशामक दल, स्थानिक लोकांनी जे काम केले त्यामुळे मनुष्यहानी टळण्याबरोबरच सदर आस्थापनाच्या आजुबाजूला असलेली लोकांची घरे बचावली. मात्र प्रभाकर कोमरपंत यांचे न्हाणीघर पूर्णपणे बेचिराख झाले आहे, तर नारायण फडते यांच्या राहत्या घराला आगीचा फटका बसला आहे.
या आगीची माहिती मिळताच उपसभापती इजिदोर फर्नांडिस, माजी नगराध्यक्ष सायमन रिबेलो, दिवाकर पागी, सामाजिक कार्यकर्ते संजू पागी, जमिनीचे मालक दिलीप गायतोंडे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक लोकांच्या सहकार्याने अग्निशामक दलाचा बंब येण्यासाठी वाटा मोकळय़ा केल्या. आगीचा भडका तीव्र असल्याची कल्पना येताच काही स्थानिक खासगी टँकरवाल्यांना बोलाविण्यात आले आणि रात्री 11 नंतर आग आटोक्यात आणण्यात यंत्रणेला यश आल्याची माहिती सदर आस्थापनाचे मालक वॉल्टर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना दिली.
ज्या भागात आग लागली तो गोदाम जरी असला, तरी त्या ठिकाणी 4 झोपडय़ा होत्या. त्यात सर्व सामान ठेवण्यात येत असे आणि त्यातील सर्व सामान जळून खाक झाले, अशी माहिती वॉल्टर यांनी दिली. या आगीची माहिती मिळताच काणकोणच्या अग्निशामक दलाचे साहाय्यक अधिकारी अशोक परीट तसेच चंद्रहास उर्फ गौरीश पागी, दर्शन देसाई, संजय जाधव या जवानांनी स्थानिक युवकांच्या मदतीने आग विझविण्याच्या बाबतीत मोलाची कामगिरी केली. त्यावेळी आपण पणजीला होतो. मात्र दुर्घटनेची खबर मिळताच आपण त्वरित घटनास्थळी धावत आलो. आपल्या कारकिर्दीतली आतापर्यंतची ही सर्वांत मोठी दुर्घटना आहे. आगीचा भडका उंच माडापर्यंत पोहोचला होता, अशी माहिती काणकोण अग्निशामक दलाचे प्रमुख रवींद्रनाथ पेडणेकर यांनी दिली. 23 रोजी सकाळी काणकोणचे उपजिल्हाधिकारी सतीश प्रभू, मामलेदार विमोद दलाल यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला.
पार्किंगवर नियंत्रण हवे
कोविड-19 च्या महामारीनंतर परदेशी पर्यटकांची गर्दी जरी कमी झालेली असली, तरी दर शनिवारी-रविवारी देशी पर्यंटक मोठय़ा संख्येने या ठिकाणी येत असतात. यापूर्वी हेच पर्यटक विमानाने प्रवास करायचे. आता स्वतःच्या वाहनाने येत असतात. त्यामुळे टॅक्सीचालकांचा व्यवसाय बसला आहे. या ठिकाणचा रस्ता अरूंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने पार्क करून ठेवण्यात येतात. पुरेशा वाहनतळाची सोय नाही. पाळोळे किनाऱयावर असलेला वाहनतळ अपुरा पडतो. त्या ठिकाणी पर्यटकांच्या वाहनांपेक्षा खासगी वाहनेच मोठय़ा प्रमाणात पार्क करण्यात येतात. काणकोण पालिकेचे या प्रकाराकडे अजिबात लक्ष नाही. पार्किंगसाठी अतिरिक्त जागा आरक्षित करण्याचा प्रयत्न केला जात नाही. वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात वाहतूक खाते, वाहतूक पोलीस तसेच पोलीस यंत्रणा अपयशी ठरलेली आहे, अशी प्रतिक्रिया अखिल गोवा शॅकमालक संघटनेचे अध्यक्ष धर्मेश सगलानी तसेच येथील उद्योजक दिलीप गायतोंडे यांनी व्यक्त केली.
स्थानिक यंत्रणेकडून दुर्लक्ष : फर्नांडिस
उपसभापती फर्नांडिस यांनी या एकंदर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. या ठिकाणी जो व्यवहार चालू आहे तो अत्यंत संशयास्पद असा असून स्थानिक यंत्रणेच्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे. आपण लवकरच काणकोणचे उपजिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी, मामलेदार, अग्निशामक दल तसेच शॅक्सचालकांची संयुक्त बैठक बोलाविणार असून भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी लक्ष देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी नगरसेवक दिवाकर पागी यांनीही याबद्दल नाराजी व्यक्त केली.
आपत्कालीन व्यवस्थापन समिती निष्क्रिय
यापूर्वी काणकोण पालिका भाजी मार्केट, पाळोळे येथील शॅक्स या भागात आग लागण्याच्या घटना घडलेल्या आहेत. चावडीवरील भाजी मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार चालू असून मिळेल त्या पद्धतीने वीजजोडणी घेण्यात आली आहे. या ठिकाणी शॉर्टसर्किट होऊन आग लागण्याच्या घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. काणकोणच्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या वारंवार बैठका होतात. मात्र या गंभीर गोष्टींसंबंधी कधीच चर्चा केली जात नसल्याचे उघडकीस आले असून ही सरकारी यंत्रणा कुचकामी ठरली असल्याचा आरोप आता सर्रास व्हायला लागला आहे. निदान या घटनेतून तरी सदर समितीने बोध घ्यावा, अशी मागणी व्हायला लागली आहे.
काणकोण अग्निशामक दलात अपुरे कर्मचारी
काणकोणच्या अग्निशामक दलात सध्या अपुरे कर्मचारी असून अवघे चार ते पाच कर्मचारी हे दल सांभाळत आहेत. या केंद्रात नियुक्त केलेल्या कर्मचाऱयांपैकी 70 टक्क्यांपेक्षा अधिक कर्मचाऱयांना प्रशिक्षणासाठी नेण्यात आलेले आहे. एक-दोन कर्मचारी रजेवर आहेत. काही जण लवकरच निवृत्त होणार आहेत. पर्यटनात अग्रेसर असलेल्या या तालुक्यात अग्निशामक दलाला अतिरिक्त कर्मचारी देण्याऐवजी या केंदावर जे जवान यापूर्वी होते त्यांची त्वरित नेमणूक करण्यात यावी अशी मागणी होत असून उपसभापती फर्नांडिस यांनी याबाबतीत लक्ष दिले आहे.