वार्ताहर/ दाभाळ :
मान्सूनपूर्व पावसाने यंदा दमदार हजेरी लावल्याने बेतोडा, निरंकाल, कोडार भागात माळरानावर मळे लावून काकडय़ा व इतर भाजीचे पीक घेणारा शेतकरी सुखावला आहे. पावसाच्या आगमनामुळे मळय़ांच्या कामांची लगबग सुरु झाली असून यंदा पावसाळी काकडय़ा (तवशी) व इतर गावठी भाजी वेळेत उपलब्ध होण्याची शक्यता आहे. जूनच्या पावसाचे गणित बांधून दरवर्षी या भागातील शेतकरी मळय़ांची लागवड करतात. पण पावसाचे आगमन लांबल्यास रुजत टाकलेल्या बियांना पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागते. यंदा शेतकऱयांचे हे कष्ट वाचले आहेत.
फोंडा तालुक्यातील बेतोडा, निरंकाल कोडार, तसेच फर्मागुडी, कोने, प्रियोळ, सावईवेरे, कुर्टी आदी भागात मळय़ांची शेती गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. डोंगर टेकडय़ांवर गावठी काकडय़ा, दोडकी, वाल, कारली, पडवळ, चिबुड, भेंडी व इतर हंगामी फळ तसेच पालेभाज्यांचे पिक घेतले जाते. ग्रामीण भागातील कष्टकरी समाजाचा हा एक जोडधंदा असून कित्येक कुटुंबे त्यावर उदरनिर्वाह करतात. परंतु मागील काही वर्षांपासून पावसाचे बिघडलेले गणित व उन्हाळय़ात जाणवणारी पाण्याची टंचाई यामुळे कित्येक शेतकऱयांनी या शेती व्यावसायातून अंग काढून घेतले आहे. या अडचणीवर मात करीत जे शेतकरी मळे लावतात त्यांना गेल्या काही वर्षांपासून रानटी जनावरांचा उपद्रव किंवा पावसाच्या अतिवृष्टीचा फटका बसू लागला आहे.
काकडी, दोडकी व कारली हे प्रमुख पावसाळी नगदी पीक असून गावठी काकडीच्या उत्पादनावर या शेतकऱयांचा अधिक भर असतो. या काकडय़ांना बाजारात अधिक मागणी असल्याने या पिकाची तयारी एप्रिल मे महिन्यापासूनच करावी लागते. उन्हाळय़ात सर्वत्र पाणी टंचाई भासत असूनही मोठय़ा कष्टाने हे शेतकरी डोंगर टेकडीपर्यंत पाण्याच्या घागरी नेऊन रोपांना पाणी देतात. हे काम मोठे कष्टाचे असते. एरवी बाजारपेठेत महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून येणारी तसेच गोव्यातील फार्ममध्ये उगवणारी काकडी वर्षभर उपलब्ध होत असते. परंतु ग्रामीण भागातील पावसाळी काकडीची चवच न्यारी असते. त्यामुळे गोमंतकीय या काकडीची आवर्जुन वाट पाहतात. बाजारातील काकडीपेक्षा या हंगामी काकडीसाठी थोडे अधिक पैसे मोजूनही लोक ती विकत घेतात. या गावठी काकडीची ख्याती आज राज्यभर पसरली आहे. जून महिन्यात बाजार येणारी ही काकडी ऑगस्टपर्यंत म्हणजे गणेश चतुर्थीपर्यंत मिळते. पावसाळय़ात परराज्यातील भाजीची आवक घटत असल्याने व श्रावण महिन्यात शाकाहार पाळणाऱयांची गरज मळय़ातून येणाऱया या ताज्या भाजीवर भागते.
जलकुंड उभारण्याची गरज
ऐनवेळी पावसाने दडी मारल्यास मळेवाल्यांना पाण्याची मोठी समस्या जाणवते. त्यावर उपाय म्हणून मळय़ांमध्ये जलकुंड बांधून त्यात पाणी साठवण्याची गरज आहे. त्यामुळे आठवडाभर पाऊस न पडल्यास मळे शिंपण्यासाठी अडचण येणार नाही. गावठी भाजी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी खात्याला अशी व्यवस्था करावी लागेल, असे काही शेतकऱयांनी सांगितले.
पाण्याच्या समस्येनंतर शेतकऱयांना भेडसावणारी मोठी समस्या म्हणजे पीक खराब होण्याची किंवा कीड लागण्याची. अतिवृष्टी किंवा पिकाला कीडा लागल्यास शेतकऱयांची सर्व मेहनत व पिकावरील खर्ज वाया जातो. त्यासाठी कृषी खात्याने शेतकऱयांना कीटक नाशक औषधे सवलतीयच दरात उपलब्ध करुन देण्याची शेतकऱयांची मागणी आहे.
युवावर्गाला शेतीत स्वारस्य नाही
सध्या बेतोडा, निरंकाल, कोडार व इतर भागात जी मळय़ांची लागवड केली जाते त्यात बहुतेक वयोवृद्ध शेतकरी कष्ट करताना दिसतात. त्यात युवावर्ग कमीच आहे. युवावर्गाला या पारंपारिक व्यवसायात फारसा रस नसल्याने वयस्कर शेतकऱयांनीच ही कृषी परंपरा टिकवून ठेवली आहे. दामू गावडे, गुरुदास गावडे, मंगेश गावडे, उत्तम गावडे, सुधाकर गांवकर, श्रीकांत गावडे, कुसूम गावडे, रोहिदास गावडे, खुशाली गावडे, लक्ष्मण गांवकर, रमाकांत गांवकर, विश्वनाथ गांवकर, रघुनाथ सालेलकर, शांताराम गावडे, दत्ता गावडे हे वयस्क शेतकरीच बेतोडा भागात मळय़ात राबताना दिसतात. बऱयाचवेळा आवश्यक श्रम घेऊनही पूर्वीप्रमाणे चांगले उत्पादन मिळत नसल्याची त्यांची खंत आहे.
सरकारने लक्ष घालावे – सरपंच दुर्गाप्रसाद वैद्य
कृषी खात्यातर्फे राबविण्यात येणाऱया विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकऱयांना मिळावा याकडे सरकारने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. त्यासाठी कृषी खात्याने शेतकऱयांच्या हिताला प्रथम प्राधान्य देण्याची गरज बेतोडा निरंकालचे सरपंच व गोवा कृषी पणन मंडळाचे संचालक दुर्गाप्रसाद वैद्य यांनी व्यक्त केली आहे.