प्रतिनिधी /पंढरपूर :
गेल्या तीन दिवसांपासून पंढरपूर तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यातच तालुक्यातील ओढे-नाले तुडूंब भरुन वाहू लागले. परिणामी पंढरपूर-सातारा, पंढरपूर-पुणे आणि पंढरपूर-मंगळवेढा हे तीन महामार्ग शुक्रवारी रात्रीपासून वाहतुकीकरता बंद करण्यात आले, तर सुपली आणि पळशी या दोन गावांचा संपर्कदेखील तुटला आहे. चंद्रभागेवरील सर्व बंधारे आणि दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.
पंढरपूर तालुक्यातील कासेगाव, बोहाळी, उपरी, पळशी, भंडीशेगाव आदी परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून येथील कासाळ ओढय़ाने धोक्याची पातळी ओलांडली अन् शुक्रवारी पंढरपूर-सातारा मार्गावरील पुलावर ओढय़ाचे पाणी आले. परिणामी सातारा-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला. अशीच परिस्थिती पुणे-पंढरपूर या पालखी मार्गावर आली. येथील भंडीशेगांवच्या पुलांवर ओढय़ाचे पाणी वाहू लागले. तेथे नव्याने बांधलेल्या पुलांचा काही भाग वाहून गेला. त्यामुळे पुणे रस्ताही बंद करण्यात आला आहे. एकीकडे ओढय़ाच्या पाण्याने पूल पाण्यात गेले असताना दुसरीकडे तालुक्यातील मंगळवेढा रस्त्यावरील सिध्देवाडी येथील माण नदीलाही पूर आला आहे. येथील वाहतुकीच्या पुलानजीक पाण्याची पातळी आली आहे. त्यामुळे सदरचा मंगळवेढा रस्तादेखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
ओढय़ांना जरी पूर आला असला, तर ओढय़ांचे ओव्हरफ्लो पाणी नद्यांना जाऊन मिळत आहे. अशातच उजनीमधून भीमेत 30 हजार क्युसेक्सचा विसर्ग प्रवाहीत होत आहे. त्यामुळे साहजिकच भीमादेखील सध्या दुथडी भरून वाहत आहे. सध्या भीमेवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत, तर पंढरपुरातील जुन्या दगडी पुलांवर पाच फुटांच्या आसपास पाणी आहे. त्यामुळे येथील व्यासनारायण झोपडपट्टी परिसरातील काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यांची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात मुसळधार पावसाने अनेक गावांतील शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले, तर अनेक लोकांच्या घरांमध्येही पाणी शिरले.