पालकमंत्री गोविंद कारजोळ यांची माहिती : सरकारी विश्रामधाममध्ये विकास आढावा बैठक : अधिकाऱयांना केल्या सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
जोरदार पावसामुळे जिल्हय़ामध्ये महापूर आला. त्यामध्ये अनेकांचे नुकसान झाले. काही जणांची घरे कोसळली तर शेतीचेही मोठे नुकसान झाले असून संबंधित नुकसानग्रस्तांच्या खात्यावर तातडीने नुकसानभरपाई जमा करावी, अशी सूचना पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी केली.
पावसामुळे अनेक जण अंधारात राहत आहेत. पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या सर्वांना पाणी तसेच इतर सुविधा पुरवाव्यात, असेही अधिकाऱयांना सांगितले. जिल्हय़ामध्ये एकूण 7 हजार 800 कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी जिल्हय़ाचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी सरकारी विश्रामधाम येथे त्यांनी अधिकाऱयांची बैठक घेतली.
पुरामुळे नुकसान झालेल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य आराखडा तयार करा. ज्या गावामध्ये नुकसान अधिक झाले आहे, त्याकडे लक्ष द्या, गावामध्ये तात्पुरते शेड उभारून लोकांना निवारा द्या, योग्यप्रकारे त्यांची सोयी करा, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. सध्या पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे पूरही ओसरला आहे. असे असले तरी पुन्हा त्या ठिकाणी जाऊन राहणे कठीण आहे. तेव्हा स्थलांतरीत केलेल्या सर्वांची योग्यप्रकारे सोय करावी, असे त्यांनी सांगितले.
मागीलवेळीही तातडीने नुकसानभरपाई देण्यात आली होती. तशाच प्रकारे यावेळीही नुकसानभरपाई द्यावी. ज्यांचे घर कोसळले आहे, त्यांना तात्काळ 10 हजार रुपये आरटीजीएसच्या माध्यमातून द्यावेत. जनता त्रस्त झाली असून तणावाखाली आहे. तेव्हा कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका, असे अधिकाऱयांना त्यांनी सांगितले.
कोरोनाबाबतही अधिक गांभीर्य घेणे गरजेचे आहे. जिल्हय़ातील सरकारी हॉस्पिटलमध्ये अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्यावर उपचार करावेत, असेही त्यांनी सांगितले. प्रादेशिक आयुक्त अम्लान आदित्य बिस्वास यांनी पूरव्यवस्थापन यंत्रणा राबविताना आधुनिक पद्धतीचा वापर करावा. अधिकारी तसेच डॉक्टरांना एसीपी व टीसीपीअंतर्गत पॅरामेडिकल प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा योग्य वापर करणेही गरजेचे आहे.
शेकडा 8.84 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण
जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी बेळगाव जिल्हय़ात आतापर्यंत 5.59 लाख व्यक्तींची कोरोना चाचणी झाली आहे. त्यामध्ये शेकडा 8.84 टक्के पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. मृत्यूदर 2.34 टक्के असल्याचे स्पष्ट केले. सध्या 496 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत. ब्लॅक फंगसचे आतापर्यंत 460 रुग्ण आढळले. त्यामधील 300 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत तर 49 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती त्यांनी दिली.
यावर पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी कोणत्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांवर अत्यंत काळजीपूर्वक उपचार करावेत, असे सांगितले. तुम्हाला ज्या अडीअडचणी आहेत त्याबाबत अहवाल तयार करून सरकारकडे पाठवून द्या, त्याबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी चर्चा करून सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.