सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
पावसाळय़ापूर्वी राज्यातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे शक्य नाही, असे निवेदन सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी केले आहे. खड्डे बुजवून रस्ते दुरुस्त करण्याचे काम खात्यातर्फे सुरू झाले आहे परंतु सर्व रस्ते खड्डेमुक्त करणे अशक्य असल्याचे ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना मंत्री काब्राल म्हणाले की, रस्ते सुरळीत करा, त्यांची योग्यती दुरुस्ती व देखभाल करा, अशे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी खात्याला दिले आहेत. पावसात तर रस्त्यांकडे विशेष लक्ष द्यावे, असेही डॉ. सावंत यांनी सूचविले आहे. खड्डे बुजवावेत, तसेच खड्डे कमीतकमी राहावेत, यासाठी खाते प्रयत्नशील आहे. खड्डे भरण्यासाठी काम सुरू झाल्याची माहिती काब्राल यांनी दिली.
…तर संबंधित अभियंता जाबाबदार!
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खात्याचे ट्विटर व इतर सोशल मीडियाचा उपयोग करून सक्रिय करणार आहे. लोकांच्या तक्रारी पाहून त्यावर कार्यवाही करणार असल्याचे मंत्री काब्राल यांनी नमूद केले.
हवामान बदलामुळे आता वर्षाचे बाराही महिने पाऊस पडतो. येत्या 31 मे पर्यंत सर्व रस्ते खड्डेमुक्त करावे, असे आदेश खात्याला दिले आहेत. जर एखाद्या रस्त्यावर खड्डे तसेच राहिले व ते भरण्यात आले नाहीत तर संबंधित विभागाच्या अभियंत्यांना जबाबदार धरणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
माजी बांधकाममंत्री पाऊसकर यांच्यावर टीका
माजी बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी रस्ते खड्डेमुक्त करण्याच्या अनेक घोषणा केल्या तसेच तारखाही दिल्या परंतु, शेवटपर्यंत काहीच झाले नाही. त्यामुळे पाऊसकर यांनी शेवटी पावसालाच दोष दिला, अशी टीकाही मंत्री काब्राल यांनी केली. काब्राल यांच्या कार्यकाळात आता खड्डे बुजतात का वाढतात ते या पावसाळय़ात समोर येणार आहे.