प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी ते नामजोशी स्टॉप दरम्यान बिबटय़ा व त्याच्या चार पिल्लांचा संचार असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या गणेशोत्सव सुरू असून, या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने या बिबटय़ाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच म्हादये यांनी केली आहे.
यापूर्वी गणेशगुळे भागात बिबटय़ाचा संचार होता. सोमवार 24 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास प्रशांत म्हादये, सुरेश शिंदे, तुषार नागवेकर यांना या बिबटय़ाचे दर्शन होताच त्यांनी या घटनेची माहिती मेर्वीचे सरपंच शशिकांत म्हादये यांना दिली. गेल्या दोन दिवसांत चार ते पाच ग्रामस्थांना या बिबटय़ासह त्याच्या पिल्लांचे दर्शन झाले आहे. त्यामुळे भितीचे वातावरण परिसरात निर्माण झालेले आहे.