गावातील एकमेव तलाव : गवत, झुडुपांची वाढ : स्वच्छता करून तलावाचे सौंदर्य टिकवण्याची मागणी
वार्ताहर /किणये
पिरनवाडी येथील तलावाच्या बाजूंनी झाडाझुडुपांची वाढ झाली असून तलावाच्या बाजूला केरकचरा टाकण्यात येत आहे. या तलावाचे सौंदर्य टिकविण्यासाठी योग्य नियोजनाची गरज आहे. गावातील सद्यस्थितीतील हा एकमेव तलाव आहे. तलावात बऱयापैकी पाणीसाठा असून तलावाची स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
उन्हाळय़ाच्या दिवसात तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते. कूपनलिका व विहिरींच्या पाणी पातळीत घट होते. अशावेळी तलावातील पाण्याचा उपयोग होऊ शकतो. कारण बऱयाच गावांमध्ये तलावाच्या काठावर विहिरी आहेत. आणि या विहिरींचे पाणी गावासाठी देण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळते. महामार्गाच्या बाजूला दोन तलाव होते. रूंदीकरणावेळी एक तलाव बुजविण्यात आला. याच तलावात उन्हाळय़ात पाणी आटल्यानंतर कुस्ती आखाडा भरविण्यात येत होता. आता तो तलाव गेला. उर्वरित तलावाची खोदाई करण्यात आली आहे. या तलावात सध्या बऱयापैकी पाणीसाठा आहे. तलावाच्या बाजूने गवत व झाडेझुडुपे वाढलेली आहेत. याची साफसफाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांतून होत आहे.
जुन्या वृक्ष लागवडीचा प्रयोग यशस्वी
पिरनवाडी येथील तलावाच्या काठावर दोन वर्षापूर्वी बेळगाव बॉक्साईट रोडवरील काढण्यात आलेल्या जुन्या झाडांचा मुळासकट काही भाग या तलावाच्या काठावर लावण्यात आला होता. त्यांना बऱयापैकी पालवी फुटूनही ती जुनी झाडे पुन्हा नव्याने फुलत असून हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
प्रशासनाचे तलावाकडे दुर्लक्ष
पूर्वी याठिकाणी दोन तलाव होते. यातील एक तलाव बुजविण्यात आला आहे. महामार्गाचे रुंदीकरण झाल्यामुळे एक तलाव बुजविला. महामार्गाच्या बाजूलाच भाजीपाला विक्री करण्यात येतो. या तलावाचे पाणी आजुबाजूच्या शेतीला मिळू शकते. या तलावाचे बांधकाम करताना दोन्ही बाजूंनी पाईप घालण्यात आल्या आहेत. मात्र, शेतशिवाराच्या बाजूने असलेल्या भिंतीचे पक्के बांधकाम करण्याची गरज होती. तलावात पाणीसाठा पूर्ण झाला की याचा शेतशिवाराला फायदा होऊ शकतो. यापूर्वी या तलावाच्या पाण्यावर अनेक शेतकरी भाजीपाला पीक घेत असत. प्रशासनाचे सध्या या तलावाकडे दुर्लक्ष झालेले आहे. केरकचरा टाकणाऱयांवर कारवाई करायला हवी. तसेच पिरनवाडीमधील या तलावाचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
– पिराजी मुचंडीकर
कचराकुंडाची व्यवस्था करावी
बेळगाव-पणजी महामार्गालगतच हा तलाव आहे. तलावाचे कामकाज अर्धवट स्थितीत आहे. तलावाचे पूर्णपणे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता आहे. याच तलावाच्या बाजूला भाजीपाला विक्री करतात. तसेच तलावाच्या काठावर व महामार्गालगत केरकचरा टाकण्यात येतो आहे. पिरनवाडी गावचा विस्तार वाढत आहे. त्यामानाने कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणावे तसे प्रयत्न होत नाहीत. नागरिक बेजबाबदारपणे कचरा टाकत आहेत. या कचरा टाकणाऱयांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच तलावाच्या बाजूला व भाजीपाला विक्री करतात. त्याठिकाणी अशा दोन ठिकाणी कचराकुंडय़ा ठेवण्याची गरज आहे. केरकचऱयामुळे तलावाचे पाणी दूषित होत आहे. कचराकुंडय़ांची व्यवस्था केल्यास तलावाचे पाणी शुद्ध राहण्यास मदत होईल.
– शितल जाधव