पहिल्याच प्रयत्नात 162 व्या क्रमांकाने उत्तीर्ण
चंद्रशेखर देसाई /कणकवली:
नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेमध्ये सध्या मुंबईत राहणारी व मूळ कणकवली तालुक्यातील पिसेकामते येथील नयोमी दशरथ साटम हिने यश मिळवले आहे. पहिल्याच प्रयत्नात ती यूपीएससी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होत 162 वा क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
मूळ पिसेकामते – फळसेवाडी येथील नयोमिचे प्राथमिक शिक्षण दहिसर मुंबई येथे झाले. एसएससी पर्यंतचे शिक्षण दहिसरमध्ये झाल्यानंतर तिने सेंट जेवियर कॉलेजमधून इकॉनॉमिक्स या विषयातून 2019 मध्ये पदवी संपादन केली. दरम्यान यूपीएससीची परीक्षा देण्याचे तिने अगोदरच निश्चित केले होते. ग्रॅज्युएशन पूर्ण होताच तिने बेंगलोर येथे यूपीएससीसाठी क्लास जॉईंन केला. काही महिने क्लास नंतर कोरोनामुळे तिला पुन्हा मुंबईला परतावे लागले. मात्र, तिने अभ्यासाची चिकाटी न सोडता शक्य होईल तसा यूपीएससीचा अभ्यासक्रम पूर्ण केला व 2020मध्ये तिने पहिल्यांदाच युपीएससीची परीक्षा दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ती 162 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.
कु. नयोमी हिचे वडील मुंबईमध्ये चाटर्ड अकाउंटंट आहेत. ते चाटर्ड अकाउंटंसी कन्सल्टन्सी चालवतात. नयोमीशी संपर्क साधला असता, आपण यूपीएससीला पास होण्याच्या जिद्दीनेच प्रयत्न केले आणि पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. आता मसुरी येथे सुमारे दीड वर्ष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आपणाला राज्य व जिल्हा दिला जाईल, असे तिने सांगितले.
कुमारी नयोमी हिला आयएएस म्हणून नियुक्ती मिळण्याची शक्यता असल्याचे समजते. आपणाला कोणती परीक्षा द्यावयाची आहे, हे वेळेत निश्चित करून दहावीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर लगेच प्रॉपर मार्गदर्शन घेऊन अभ्यास केला तर यश निश्चित मिळू शकते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःला काय बनायचे आहे, हे निश्चित करून पुढे वाटचाल केली तर यशाला निश्चित गवसणी घालू शकाल, असे तिने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.