पुणे मेट्रोच्या उद्घाटनात भाजपकडून राजकारण-पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप
प्रतिनिधी/ कराड
मुंबई, पुणे व नागपूर मेट्रोचे प्रकल्प हे केंद्रातील काँग्रेसच्या सरकारने आणले आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना प्राधान्याने पुणे व नागपूर मेट्रोला प्राधान्याने परवानगी आणली होती. आपल्या निवडणूक कार्यक्रमाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. या उद्घाटन कार्यक्रमात भाजपने राजकारण केले असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.
काँग्रेसचे शहराध्यक्ष आप्पा माने, माजी नगरसेवक फारूक पटवेकर, इंद्रजित गुजर, झाकीर पठाण, श्ऱीकांत मुळे, इंद्रजित चव्हाण, जावेद शेख, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काही प्रकल्प मोठे असतात. त्याला एका राजवटीत मंजुरी मिळते. दुसऱया राजवटीत काम पूर्ण होते. तिसऱया राजवटीत उद्घाटन होते. पुणे मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधानांनी आज केले असले तरी ते कामच पूर्ण नसल्याचे खुद्द पवारसाहेबांनी सांगितले आहे. मला पुण्याच्या आयुक्तांचा काल कार्यक्रमाला येण्यासाठी फोन आला होता. पण रितसर निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्याने आपण उपस्थित राहणार नसल्याचे त्यांना सांगितले आहे. मला निमंत्रण नसल्याच्या कारणाने काँग्रेसने पुण्यात आंदोलनही केले आहे. वास्तविक मुंबई, पुणे, नागपूर मेट्रोची कामे काँग्रेसच्या युपीए सरकारच्या काळात मार्गी लागलेली आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री असताना तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री कमलनाथ यांना भेटून या दोन प्रकल्पांच्या परवानग्या आणल्या होत्या. असे मोठे प्रकल्प एका सरकारच्या राजवटीत पूर्ण होत नसतात. त्यात अनेक सरकारांचे योगदान असते. हे लक्षात घेऊन यासाठी योगदान देणाऱया सर्वांना सन्मानाने निमंत्रण देणे गरजेचे होते. पण ते दिले नाही. भाजपला पुणे महापालिकेची निवडणूक महत्वाची वाटल्याने त्यांनी यात राजकारण केले आहे.
कलर कोडेड झोनिंग मॅपमुळे अनिश्चितता संपली
आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे कराड विमानतळासह 135 विमानतळांच्या परिसरात विमानांच्या सुरक्षित उड्डाणांसाठी काही निर्बंध लागू झाले आहेत. कराडमध्ये हे निर्बंध लागू झाल्यानंतर बांधकाम परवानग्या थांबल्या होत्या. यावरून गैरसमज, अफवा सुरू झाल्या होत्या. मी स्वतः याबाबत केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया व भारतीय विमानपत्तन प्राधिकरणचे अध्यक्ष संजीवकुमार यांची दिल्ली येथे भेट घेतली. विमानतळाचा कलर कोडेड झोनिंग मॅपबाबत चर्चा केली. बांधकामे रखडल्याचा मुद्दा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. तेथे भेटून निघत असतानाच संजीवकुमार यांनी कराड विमानतळाचा कलर कोडेड झोनिंग मॅप मंजूर झाला असून तो महाराष्ट्र विमानतळ कंपनीकडे पाठवला असल्याचे सांगितले. या नकाशात बांधकामांच्या उंचीबाबत स्पष्टता असल्याने या नकाशाबाबतची अनिश्चितता संपली आहे. कराडच्या औद्योगिक प्रगतीसाठी हवाई कनेक्टिव्हीटी महत्वाची आहे. त्यासाठी येथे दैनंदिन विमानसेवा सुरू होण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. कराड विमानतळावर रात्रीची विमाने उतरण्याची सुविधा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे त्यांनी सांगितले. याबरोबरच आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मंजूर झालेल्या मुंबई-बेंगळूर औद्योगिक कॉरिडॉरमुळे येथे गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात राज्यपालांनी राष्ट्रगीत सुरू असताना सभागृहातून निघून जाऊन राष्ट्रगीत आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. अनिष्ट प्रथा निर्माण झाली. हे मुद्दाम होत आहे की अनावधानाने हा प्रश्न आहे. मात्र महाराष्ट्राच्या संसदीय मंडळाच्या परंपरेला न शोभणाऱया घटना घडत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्याला प्राधान्य देण्याऐवजी मोदी निवडणुकीची भाषणे करण्यात दंग होते. भारताने युक्रेनच्या विरोधात मतदान केल्याने स्थानिक पातळीवर भारतीय विद्यार्थ्यांना रोषाचा सामना करावा लागल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.