प्रतिनिधी / सांगली
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर व सोलापूर या जिल्ह्यांच्या विकासाचे नवे दार आणि दळणवळणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या अशा पुणे मिरज ते लोंढा या रेल्वेच्या दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाला मोठी गती आली आहे. मिरज ते पुणे या मार्गावरील ताकारी शेणोली आणि पुण्याच्या दिशेने आळंदी पर्यंतचे काम पूर्ण झाले आहे.
यापैकी काही मार्गावर रेल्वेच्या वतीने विद्युत इंजिनांची यशस्वी चाचणी घेण्यात आली. येत्या काही महिन्यातच दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम पूर्ण करण्याचा रेल्वेचा मानस आहे. दरम्यान या मार्गाला पूरक असणाऱ्या कोल्हापूर ते मिरज या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम यापूर्वीच पूर्ण झाले आहे. दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम झाल्यानंतर कोल्हापूर छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत जाणाऱ्या महालक्ष्मी, कोयना, सह्याद्री, तसेच हुबळी कुर्ला, कोल्हापूर गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, कोल्हापूर अहमदाबाद या प्रमुख एक्सप्रेस सह सातारा, पुणे पॅसेंजर आणि सर्व मालगाड्या या विजेच्या इंजिनावर धावणार आहेत.